चाकण, (वार्ताहर) – संस्कारक्षम पिढी घडवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आई-वडील व शिक्षक यांनी जबाबदारी ओळखून प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे, असे मत चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी व्यक्त केले.
चाकण येथे महिला व कायदा या विषयावर वाघ बोलत होते. यावेळी भरत जगदाळे, शंकरराव पोटवडे, आदर्श शिक्षक मनोहर मोहरे, रुपेश पवार आदी उपस्थित होते. वाघ म्हणाले की, आधुनिक युगात मोबाइल, संगणक या भौतिक साधनांमुळे दोन व्यक्तीतील संवाद हरवला असून, कुटुंबाचे एकत्रित भोजन, पौराणिक अध्यात्मिक कथांची मैफिल या आठवणी काळाच्या ओघात लुप्त झाल्या असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कायदेविषयक माहिती देताना त्यांनी अधिक रकमेचा परतावा मिळेल या मोहात अनेक जण अडकतात व मुद्दलही गमावतात. मुद्देमाल परत मिळण्याची अपवादात्मक शक्यता असते. त्यासाठी सावधगिरी हा एकमेव पर्याय आहे.
महिलांसाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यातील विविध कलमांची माहिती वाघ यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज थोरात यांनी तर अतुल सवाखंडे यांनी आभार मानले. रोहित देव, अनिल मोरे, गौरी भापकर, सुवर्णा मिसाळ संजय बोथरा, आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.