राजगुरूनगर (प्रतिनिधी) – शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी मतदारसंघात नेत्यांच्या सभांचा महापूर वाहत आहे. तर निवडणूक प्रशासनाला त्यासाठी मतदार केंद्रावर आवश्यक साधनसामग्री पुरविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात तब्बल 32 उमेदवार उतरल्याने निवडणूक प्रशासनाला तीन बॅलेट युनिट जोडावी लागणार आहे. पहिल्या बॅलेट युनिटवर राजकीय पक्षाचे उमेदवार असणार असल्यामुळे 16 उमेदवार येणार तर दुस-या बॅलेट युनिटवर 16 उमेदवार तर तिस-या बॅलेट युनिटवर फक्त नोटाचे बटण येणार असल्यामुळे मतदारांना आपल्या पसंतीचा उमेदवार आणि चिन्ह शोधण्याची चागंलीच कसरत करावी लागणार आहे.
तिस-या बॅलेट युनिटवर नकारात्मक अर्थात नोटा मतदान कमी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. तर तीन बॅलेट युनिट एकाच ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याने गोंधळ उडणार आहे.
…तरी दुरंगी लढतच
शिरूर लोकसभा मतदारसंघात जरी 32 उमेदवार रिंगणात असले तरी तुल्यबळ लढत ही दुरंगीच आजी-माजी खासदारांमध्ये रंगणार आहे. महायुतीकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तर महाविकास आघाडीकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे रिंगणात असून दोघांमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत.
राजकीय गोंधळावर जोरदार चर्चा
महाराष्ट्रात दोन राजकीय पक्ष फुटले गेल्या वर्षभरापासून चाललेल्या राजकीय गोंधळावर मोठी चर्चा रंगत आहे. पक्षाच्या स्थापना केलेल्या राष्ट्रवादीचे शरद पवार यांचा घड्याळ चिन्हासह पक्ष तर उद्धव ठाकरे यांच्या धनुष्यबाण चिन्हासह शिवसेना पक्ष वेगळा झाल्याने याचा फटका नेमका कोणाला बसणार हे दि. 4 जून रोजी मतमोजणीतून समोर येणार आहे. फोडाफोडीच्या राजकारणामुळे नक्की कोणाला बहुमत मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उन्हाचा परिणाम होणार
महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी खेड-आळंदी मतदारसंघात नेत्यांच्या सभांचा महापूर वाहत आहे.तीव्र उन्हाळ्यात मतदान आल्याने मतदानावर मोठा परिणाम होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहेत.