नवी दिल्ली – यंदाच्या लोकसभानिवडणुकीत भाजप १८० जागांचा आकडा गाठणे कठीण असल्याची जाणिव झाल्याने त्यांनी आता पुन्हा हिंदु-मुस्लिम अपप्रचाराचा आधार घ्यायला सुरूवात केली आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिमी लीगची छाप असल्याचा जो आरोप केला होता त्याचा आज कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी जोरदार प्रतिवाद केला. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला.
येथील कॉंग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना,सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की,भाजपची निवडणुकीवरील पकड पुर्ण ढिली पडत आहे म्हणूनच पंतप्रधानांचे मुस्लिम लीगवरील प्रेम पुन्हा उफाळून आले आहे.त्या म्हणाल्या की काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून देशाच्या भवितव्याची ती ब्लू प्रिंट आहे आणि लोकांकडून त्याचे स्वागत होत आहे.
१० वर्षे सत्तेत राहिल्यानंतर, जेव्हा देश निवडणुकीच्या उंबरठ्यावर आहे तेव्हा त्यांना निवडणुकीच्या निकालाची वस्तुस्थिती लक्षात येऊ लागली असून त्यामुळे ते घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांनी पुन्हा हिंदू-मुस्लिम स्क्रिप्ट वाचायला सुरूवात केली आहे.
कॉंग्रेसचा जाहीरनामा म्हणजे जनतेच्या आत्म्याचा ठसा आहे आणि एका नव्या आशेचा उदय आहे, त्यावर तरुणाईची छाप आहे, तिच्यावर शेतकऱ्यांची छाप आहे, त्यावर महिलांची छाप आहे, कामगारांची छाप आहे आणि आम्ही त्यांचा सत्तेतील सहभाग आणि अधिक प्रतिनिधित्व सुनिश्चित करू,असे त्या म्हणाल्या. गेल्या १० वर्षात मोदी सरकारने देशावर लादलेल्या प्रत्येक समस्येचे निराकरण काँग्रेसच्या न्याय पत्रात आहे.
नरेंद्र मोदी यांचे ‘मुस्लीम लीगवरील प्रेम’ नवीन नाही हे वास्तव आहे, असा दावा त्यांनी केला. हे तेच लोक आहेत जे स्वातंत्र्याच्या महान लढ्यातही इंग्रजांच्या पाठीशी उभे राहिले आणि ज्यांनी मुस्लिम लीगसह जातीय तेढ निर्माण करण्याची एकही संधी सोडली नाही. लक्षात ठेवा, जेव्हा १९४२ मध्ये महात्माजींच्या हाकेवर देशाने इंग्रजांच्या विरोधात चलेजावची चळवळ सुरू केली त्यावेळी श्यामा प्रसाद मुखर्जी हे केवळ बंगालमध्ये मुस्लिम लीगच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून व्यस्त होते. त्यावेळी त्यांचे मुस्लिम लीग बरोबर तीन राज्यांत संयुक्त सरकार होते.
या सरकारांनी ब्रिटीशांकडून सूचना घेऊन स्वातंत्र्याचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला हा इतिहास आहे असे त्या म्हणाल्या. वस्तुस्थिती अशी आहे की, काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यापासून भाजपच्या गोटात घबराट पसरली आहे, असा दावा श्रीनेत यांनी केला.
आणखी एक मोठी वस्तुस्थिती अशी आहे की भाजपची संख्या खूप वेगाने कमी होत आहे, ताज्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की ते १८० जागांचा आकडा पार करण्यासाठी संघर्ष करत आहेत,असे त्यांनी नमूद केले. सत्ताधाऱ्यांनी आता आपल्या बॅगा भरायला घ्याव्यात अशी उपरोधिक सूचनाही त्यांनी केली.