नागपूर – सध्या सर्वत्र व्हॉट्स अ्प स्टेटस ठेवणे हा एक ट्रेंड झाला आहे. हे एक चांगले माध्यम आहे. मात्र, आपण ठेवत असलेले स्टेटस जरा विचारपूर्वक ठेवणेही तेवढेच गरजेचे आहे. एकदा ठेवलेले स्टेट्स 24 तासांनतर निघून जाते. मात्र, याच दरम्यान आपले स्टेटस जर कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असेल तर तो गुन्हा ठरतो. तेव्हा सोशल मीडियाचा वापर करताना आपल्याला जबाबदारीचे भान असणे गरजेचे आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नमूद केले.
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या एका 27 वर्षीय युवकांने माझ्यावर दाखल असलेले गुन्हे रद्द करण्यात यावे, अशा मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे केली होती. या याचिकेवर सुनावणी करीत खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. ही सुनावणी नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी एसए मेनेजेस यांच्या न्यायालयापुढे पार पडली.
न्यायालयाने म्हटले की, आरोपीने व्हॉट्सऍपवर असे स्टेटस ठेवून विशिष्ट समुहाच्या धार्मिक भावना दुखावल्या. एवढेच नव्हे तर आपत्तीजनक माहिती गुगलर सर्च करण्यासाठी उसकावले, म्हणून आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आणि असे स्टेटस ठेवण्याचे कुठलेही औचित्य नव्हते, असे म्हणत आरोपीची याचिका न्यायालयाने फेटाळली.
नागपूर खंडपीठाकडे याचिका दाखल करणाऱ्या आरोपी युवकाने मार्च 2023 मध्ये त्याच्या व्हॉट्सऍपवर एक विशिष्ट प्रश्नाचे स्टेटस ठेवले होते. ते स्टेटस पाहणाऱ्यांकडून चमत्कारिक उत्तरे मिळवण्यासाठी त्याने गुगलवर करा असेही म्हटले होते. जेव्हा तक्रारकर्त्याने गुगलवर सर्च केले तर त्याला धार्मिक भावना दुखावल्या जातील असे काही माहिती मिळाली. मात्र, आरोपीने म्हटले की, असे स्टेटस ठेवण्यामागे माझा कुठलाही वाईट उद्देश नव्हता. तर हे स्टेटस फक्त माझ्याच संपर्कातील लोकांना दिसत असल्याने मी ते ठेवले होते असा दावा केला.