मुंबई – शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आदेश दिले आहे. यासंदर्भात शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांकडून लेखी उत्तर मिळाल्यानंतर नार्वेकरानी आज बैठक घेतली आहे. या बैठकीत किती आमदारांनी नोटीसला उत्तर दिले आणि किती आमदारांनी मुदतवाढ मागितली याचा आढावा घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या आमदारांना लवकरच सुनावणीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणात निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस जारी केली होती. या नोटीसला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला होता.
दरम्यान, शिवसेनेच्या मूळ घटनेचा अभ्यास करून या प्रकरणावर निर्णय घेतला जाईल, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची मागणी केली. निवडणूक आयोगाकडून घटनेची प्रत मिळताच त्यांनी कारवाईला सुरुवात केली. आता राहुल नार्वेकर हे कोणता निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.