Chandrayaan 3 Vikram Lander: चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला स्लीप मोडमधून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इस्रोने शुक्रवारी (२२ सप्टेंबर) सांगितले की, लँडर आणि रोव्हरकडून सिग्नल मिळू शकलेेेला नाही.
इस्रोने ट्विटरवर पोस्ट केले आहे की, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संवाद स्थापित करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत जेणेकरून त्यांची जागृत स्थिती निश्चित केली जाऊ शकते. सध्या त्यांच्याकडून कोणताही संकेत मिळालेला नाही. संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरूच राहतील.
चांद्रयान-3 बाबत स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश देसाई यांनी सांगितले की, आता शनिवारी लँडर आणि रोव्हर सक्रिय करण्यासाठी प्रयत्न केले जातील. नीलेश देसाई यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, चंद्रावर सकाळ झाली आहे. यापूर्वी आमची योजना 22 सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर पुन्हा सक्रिय करण्याची होती, परंतु काही कारणांमुळे ते होऊ शकले नाही.
आता उद्या 23 सप्टेंबरला शनिवारी पुन्हा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी गुरुवारी, इस्रोने सांगितले होते की लँडर आणि रोव्हर 16 दिवसांपासून स्लीप मोडमध्ये आहेत आणि शुक्रवारी दोन्ही सक्रिय होतील. केंद्रीय विज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनीही गुरुवारी लोकसभेत माहिती दिली होती की, प्रज्ञान आणि विक्रम यांंना लवकरच स्लीप मोडमधून बाहेर आणले जाईल.
दरम्यान,23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग करून भारताने इतिहास रचला होता. चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचणारा भारत हा चौथा देश ठरला तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा तो पहिला देश ठरला.
विक्रम लँडर सुरक्षितपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाऊन पोहोचला आहे. विक्रम लँडर आणि रोव्हरचं जीवनमान 14 दिवसांचं आहे.23 ऑगस्टला चंद्रावर पहाट होणार होती. त्यामुळे लँडर त्या दिवशी तिथे लँड झाला. इस्रोने लँडर आणि रोव्हरला 4 सप्टेंबरला झोपवलं होतं. कारण त्या दिवशी चंद्रावर दिवस संपणार होता.
लँडर आणि रोव्हरला इलेक्ट्रिसिटीची गरज असते. चंद्रावर सौर उर्जेचे पॅनल सूर्यप्रकाशावर चालतात. मात्र आता रात्र असल्याने त्यांना वीज मिळत नाहीये.
जर 23 सप्टेंबरला चंद्रावर सूर्यप्रकाश आल्यानंतरही लँडर आणि रोव्हरने काम करणं थांबवलं तर त्यांचं काम कायमचं थांबेल.कारण त्यांची निर्मिती अशा पद्धतीने केलं होतं की त्यांचं जीवनमान फक्त 14 दिवसांचं असेल.
लँडर आणि रोव्हरचे रिसिव्हर सुरू आहेत. जर रोव्हर आणि लँडर सुरू झाले तर चंद्रावरची माहिती पृथ्वीवर पाठवतील जशी या आधी पाठवली आहे. नाहीतर इस्रोच्या मते तो भारताचा दूत म्हणून कायमस्वरुपी तिथे राहील.