मुंबई – महाराष्ट्रात मागील काही दिवसांत अनेक ठिकाणी केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडल्या आहेत. यातून अनेकांना अटकही झाली आहे. मात्र आता केंद्रीय संस्थांना बदनाम करण्याच षडयंत्र महाराष्ट्रातील प्रशासकीय पातळीवर शिजतय का, असा प्रश्न उपस्थित करत याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
विधानसभेत बोलताना आशिष म्हणाले की, उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना सरकारने वसुली प्रकऱणी निलंबित केलं आहे. त्यांना निलंबित केल ते योग्यच आहे. आमचा त्याला पाठिंबा आहे. मात्र त्रिपाठी यांच्यावर आरोप होते की, त्यांनी एका व्यक्तीकडे इन्कम टॅक्सच्या धाडीची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. हे गंभीर असून महाराष्ट्रासाठी चांगल नाही.
दरम्यान केंद्रीय संस्थांच्या नावाने धमकी देऊन इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किती खंडणी गोळा केली, हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. यात केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचं षडयंत्र शिजतय का, असा प्रश्न विचारत गृहमंत्र्यांनी याची चौकशी करावी अशी मागणीही शेलार यांनी सभागृहात केली.
यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं की, शेलार यांच्या मुद्द्याची आपण दखल घेतली आहे. या संदर्भात माहिती घेऊ तसेच यात काही तथ्य आढळल्यास चौकशी करण्याचं आश्वासन वळसे-पाटील यांनी दिलं.