ट्रिंग ट्रिंग… ट्रिंग ट्रिंग…
वांद्रे येथील महालातील टेलिफोनची बेल रात्री खणखणते… बराच वेळ झाला तरी वाजणे थांबत नाही हे बघून राजे पांघरूण भिरकावून फोन ताब्यात घेतात.
“हॅलो… कोण या अवघड वेळी, झोपायला पण देत नाही, पूर्वीचे राज्यकर्ते तरी बरे होते’ असे म्हणून जीभ चावली, अरेच्चा राजे तर आपणच आहोत.
“राजे, मैं मुख्यमंत्री बोलत रहा हूं.’
ताडकन जागे होत “काय? मुख्यमंत्री बदलला की काय मी झोपेत असताना?’ हे देवा…!
“डरीये नाही जी, मी उत्तर परदेशचा मुख्यमंत्री.’
राजे स्वत:ला सावरत, “अच्छा अच्छा बोला’
“काय बोलू राजे, आमची तर झोप उडाली आहे. आम्ही दोघं रामगढच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभे आहोत.’
“का? आमी दोघे कोण जी, तुम्ही तर सिंगल…’
“अहो मी आणि बिहारचे सीएम’
“का’?
“तुम्ही पाठवलेले जय आणि विरूंना रिसिव्ह करायला. बेरोजगारांचा लवाजमा तुम्ही साभार परत केला ना, त्यांना सांभाळायला नको?’
राजे गालातल्या गालात हसत’ तुमचेच आहेत, सांभाळा की. त्यांना काम द्या. कारण ते नेहमी “काम तो हम सिर्फ पैसों के लिये करते है, असे डॉयलॉग म्हणत असतात’
“सही कहा, आमचे लोक कामात वाघ, तेच तर मार्गदर्शन हवे, तुम्ही कसे सांभाळले? हम तो सोच सोच कर परेसान है. बिहारीबाबू तर हात गमावलेल्या ठाकुर सारखे उभे आहेत प्लॅटफॉर्मवर.’
“सीएम जी, म्हणूनच म्हणतो, मिलकर रहो, जो शिशे के घर में रहते है, वो दुसरो पर पत्थर नहीं फेका करते.’
“ओके राजे. नॉट अगेन. पण आता या जय विरूंचा काय बंदोबस्त करू?
“टेंशन नका घेऊ, चौदा दिवस क्वारंटाइन ठेवा, आठपंधरा दिवस कुटुंबासोबत राहू द्या, तोवर लॉकडाऊन संपून इथले उद्योग सुरळीत सुरू होतात. मग ती मंडळी पुन्हा रिटर्न तिकीट काढून मुंबई गाठणार हे निश्चित. तुम्ही फक्त रिटर्न तिकीटची तयारी ठेवा. मुंबई आहे ही.’
“खरं राजे?’
“तुमची शपथ.’
“इतकं सोपं आहे, धन्य आहात राजे.’
“तुम्ही आम्हाला सांभाळा, आम्ही तुम्हाला सांभाळू, बाबूंना पण सांगा.’
“अवश्य. या भावूक प्रसंगी एक गाणं गुणगुणतो राजे.’
“लवकर, मला झोप आली आहे.’
“ये दोस्ती, हम नहीं छोडेंगे, तोडेंगे दम मगर,
तेरा साथ ना छोडेंगे…!
आवडले का राजे?’
दोन मिनिटे शांततेतच जातात.
“राजे… कहॉं खो गये…?’
पलिकडून घोरण्याचा आवाज येतो. सीएम समाधानाचा निश्वास टाकतात व फोन कट करतात.
– धनंजय एकबोटे