मुंबई – दिल्ली कॅपिटल्स संघातील करोनाची वाढती प्रकरणे पाहता त्यांचा राजस्थान रॉयल्सशी होणारा सामनाही मुंबईतच हलवला गेला आहे. हा सामनाही पुण्यात होणार होता. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. दिल्लीचा बुधवारी पुण्यात होणार सामना मुंबईतच खेळवला गेला होता. रुग्णालयात असलेल्या मिशेल मार्शच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्याच्यासह फिजिओ पॅट्रिक फरहार्ट व विलगीकरणात असलेला टीम सेफर्ट यांची पुन्हा एकदा करोना चाचणी केली जाणार असून, त्याचा अहवाल आल्यावरच ते पुढील सामन्यांत खेळू शकतील का ते स्पष्ट होणार आहे.
आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील दिल्ली व राजस्थान यांच्यातील लढत मुंबईतच हलवली गेली असून, त्यामागे खेळाडूंना प्रवास करावा लागू नये, हाच हेतू असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. दिल्ली संघाचे फिजिओसह अन्य चार सदस्य करोनाबाधित झाले आहेत. तसेच मिशेल मार्श व टीम सेफर्ट हे दोन खेळाडूही बाधित आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशा स्थितीत दिल्लीचा संघ मुंबईतच राहणे योग्य ठरेल व त्यांना पुण्यातील तसेच नवी मुंबईतील मैदानांवर सामना खेळण्यासाठी प्रवास करावा लागू नये, यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. सामन्याचे ठिकाण वगळता दिल्ली आणि राजस्थान यांच्या सामन्याबाबत अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दिल्ली संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट तसेच मिशेल मार्श व टीम सेफर्ट यांच्या प्रकृतीबाबत वैद्यकीय तज्ज्ञ लक्ष ठेवून आहेत. त्यातील मार्शवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सेफर्टची करोना लक्षणे सौम् असल्यामुळे तो विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्यावर होणार असलेल्या करोना चाचणीत निगेटिव्ह ठरल्यावर संघाच्या बायोबबलमध्ये प्रवेश करू शकतो. मात्र, फरहार्ट व मार्श यांना नियमानुसार विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.
दिल्ली संघाच्या बाबतीत जे धोरण बीसीसीआयने ठेवले आहे तेच अन्य संघांबाबतही ठवले जाणार आहे. प्रत्येक संघातील खेळाडूंची वारंवार करोना चाचणी केली जाणार आहे व त्याचे अहवाल आल्यावरच पुढील निर्णय घेतले जाणार आहेत, असे आयपीएल समितीने सांगितले आहे.