मुंबई – हार्दिक पांड्याने या मोसमात “थिंकिंग कॅप ऑन’ ठेवली आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार उत्तम फलंदाजी आणि नेतृत्त्वाचा चांगला वापर करत असल्याने त्याचा खेळ उंचावला आहे, असे मत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.
सुनील गावस्कर म्हणाले, बडोदाच्या या स्टार अष्टपैलू खेळाडूने गुजरात टायटन्सचे यशस्वीपणे नेतृत्व केले आहे. त्याने आपल्या जबाबदार खेळींनी अनेक वेळा संघाला वाचवले आहे. 2019मध्ये पाठीवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पांड्याला फॉर्म मिळविण्यासाठी झगडावे लागत होते. गतवर्षी 8 नोव्हेंबर रोजी दुबई येथे झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत तो नामिबियाविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.
आयपीएलपूर्वी दुखापतीमुळे त्याला फारसे क्रिकेट खेळता आले नाही. आता तो पूर्ण तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याने काही सामन्यांमध्ये फलंदाजीत सातत्य दाखविले आहे. तो पॉवरप्लेमध्येही चांगली फलंदाजी करत असल्याचे गावस्कर यांनी निदर्शनास आणून दिले.