सातारा, (प्रतिनिधी) – उद्योगांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि गुंतवणूकदार, व्यावसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत सातारा औद्योगिक वसाहतीतील ‘मास’ भवनात उद्या, दि. 5 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद होणार आहे.
या परिषदेत राज्य शासनासोबत सामंजस्य करार होणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार असून, विकास आयुक्त (उद्योग, निर्यात) तथा अध्यक्ष (मैत्री), सातारा जिल्हाधिकारी, उद्योग सहसंचालक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हा स्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्ह्यांना केंद्र मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे, गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या परिषदेचा उद्देश आहे.
जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्रांबाबत चर्चासत्र, गुंतवणुकीच्या संधी, इतर क्षमता असलेल्या क्षेत्रांमधील गुंतवणूक, व्यवसाय संधींबाबत चर्चा, सामंजस्य करार, उद्योजकांचे अनुभवकथन आदींचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील निर्यातक्षम उत्पादने, भौगोलिक मानांकन असलेली उत्पादने, एक जिल्हा एक उत्पादन आदींचे प्रातिनिधिक स्वरूपात प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.