मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचे निवेदन
रावणगाव-येथील ग्रामपंचायतीने दहा वर्षांच्या कार्यकालात केलेल्या विविध विकास कामांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यातआली आहे. याबाबत नवनाथ आटोळे व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुणे येथे निवेदन दिले आहे.
रावणगाव ग्रामपंचायतीने सन 2011 ते 2020 या दहा वर्षांच्या कार्यकालामध्ये केलेल्या विविध विकासकामांमध्ये अनियमितता दिसून येत आहे. या बाबत सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे या विकास कामांबाबत माहिती विचारली असता टाळाटाळ केली जाते. पंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या समाजमंदिर दुरूस्ती कामाऐवजी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी शौचालय दुरुस्ती, पथदिवे दुरुस्ती वित्त आयोगातील वैयक्तिक शौचालय लाभ, गावातंर्गत मुरूम, खडीकरण निधी, अंगणवाडी शाळा दुरुस्ती, गटार योजना, टंचाई निवारण निधी, रमाई, प्रधानमंत्री इंदिरा आवास योजना तसेच इतर घरकुल योजनेतील व रोजगार हमी विहीर योजनेतील खातेनिहाय चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करावी. ही कामे करताना मूल्यमापन करणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद अभियंत्यांच्या कामकाजावरही ग्रामस्थांना शंका असून त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या बाबत ग्रामविकासमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आमदार, पोलीस निरीक्षक दौंड, सरपंच व ग्रामसेवक यांनाही निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर नवनाथ आटोळे, विनोद गाढवे, लक्ष्मण रांधवण, संपत आटोळे, रमेश सयाजी आटोळे, हौशीराम आटोळे, संजय गाढवे, दिनकर आटोळे, नाना सांगळे, कुमार चव्हाण, जितेंद्र नेमाडे, आप्पा भोपाळ, विकास आटोळे, प्रल्हाद आटोळे आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.