खेड – राज्यमार्गाचे काम सुरू असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायतकडे उपलब्ध असलेले लोखंडी बॅरिकेट्स आमच्या ताब्यात द्या, अशी बतावणी करत राज्यमार्गाच्या ठेकेदाराकडे पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने नेलेले बॅरिकेट्स गेली सहा महिन्यांपासून परत दिलेच नाहीत. याबाबत चौकशी करण्याची मागणी खेड (ता. कर्जत) ग्रामपंचायतने केली आहे.
गेली सहा महिन्यांपूर्वी कर्जत-खेड राज्यमार्गाच्या डांबरीकरणाचे काम सुरू असताना गणपत मुळे असे नाव असलेल्या रस्ता ठेकेदाराच्या पर्यवेक्षकाने ग्रामपंचायतच्या ताब्यात असलेले आठ बॅरिकेट्स नेले होते. नेलेले हे बॅरिकेट्स राज्यमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सुरक्षितरित्या ग्रामपंचायतच्या परत ताब्यात देतो, असे संबंधित पर्यवेक्षकाकडून सांगण्यात आले.
सध्या या राज्यमार्गाचे काम पूर्ण होऊन सहा महिने उलटून गेले तरी त्यातील काही बॅरीकेट्स अद्यापही माघारी देण्यात आले नाहीत. याबाबत संबंधित कर्मचाऱ्याला विचारणा केली असता त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. त्यामुळे ठेकेदाराने सांभाळेल्या या कर्मचाऱ्याने या बॅरीकेट्सची कशी विल्हेवाट लावली आहे? याची चौकशी सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराने करावी, अशी मागणी खेड ग्रामपंचायतीने केली आहे.