कानपूर – न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात भारताच्या अक्सर पटेलने पाच बळी मिळवले. मात्र, त्याच चेंडूवर आपल्या कामगिरीची नोंद करताना त्याने सूर्यकुमार यादवची मदत घेतली व ही नोंद चुकली. या चेंडूवर त्याने 27 नोव्हेंबरच्या जागी ऑक्टोबर असे लिहिले. हा चेंडू व त्यावर लिहिलेला मजकूर याचा फोटो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.
पाच बळी घेतल्याची आठवण म्हणून अक्सरच्या हातात असलेल्या चेंडूवर 27 नोव्हेंबर अशी तारीख लीहिणे आवश्यक होते. पण त्यावर चुकीचा महिना लिहिला गेला. नोव्हेंबर ऐवजी ऑक्टोबर लिहिण्यात आले होते.
अक्सरने कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात 62 धावांत पाच बळी घेतले. कसोटी कारकिर्दीत त्याने ही कामगिरी पाचव्यांदा केली आहे. पहिल्या 4 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक पाच वेळा पाच बळी घेण्याचा विक्रम भारताकडून केवळ पटेलच्या नावावर आता जमा झाला आहे.
नरेंद्र हिरवानी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अक्सरने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यानंतर 3 सामन्यांत 27 बळी घेतले, ज्यामध्ये त्याने 4 वेळा एका डावात पाच बळी घेतले होते व आता न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही त्याने पाच गडी बाद करण्याची किमया केली.