कानपूर – भारतीय संघाने आपला दुसरा डाव 7 बाद 234 धावांवर घोषित केला. त्यात पहिल्या डावातील शतकवीर श्रेयस अय्यर व यष्टीरक्षक वृद्धिमान साहा यांनी अफलातून अर्धशतके फटकावली. भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर पहिल्या कसोटीत विजयासाठी 284 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
कर्णधार अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना अद्याप अपयशातून बाहेर पडता आलेले नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत या दोघांनाही पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही मोठी खेळी करता आली नाही.
विराट कोहलीने विश्रांती घेतल्यामुले पहिल्या कसोटीत रहाणेकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असले तरीही त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. पहिल्या डावात त्याने 35 तर दुसऱ्या डावात केवळ 4 धावा केल्या. 2017 सालापासून रहाणे घरच्या मैदानावर 28 पैकी 20 वेळा फिरकी गोलंदाजांविरुद्ध बाद झाला आहे.
पुजाराने पहिल्या डावात 26 तर दुसऱ्या डावात 22 धावा केल्या. पुजारा व रहाणे सध्याच्या भारतीय संघातील सर्वात तंत्रशुद्ध फलंदाज मानले जातात मात्र, गेल्या तीन ते चार मोसमांपासून त्यांना सातत्याने अपयश येत असल्याने त्यांच्यावर प्रचंड टीका होत असून न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून त्यांना वगळले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.