दत्तात्रय आंबुलकर
आयुष्यात कुठल्या ना कुठल्या कारणाने एकाकी जीवन जगणाऱ्या महिलांचेही काही प्रश्न असतात. रोजच्या जीवनातील एकाकीपण त्यांच्यासाठी अनेकार्थाने आव्हान ठरते. या आव्हानांना या महिला आपापल्यापरीने तोंड देत मात करत असतात.
आपल्या एकटेपणाला कुणा सखीची साथसोबत लाभली तर या महिलांचे आयुष्य आनंदी बनते. स्वानुभवातून शिकलेल्या व आयुष्यात सावरलेल्या निर्मल चंडेल यांनी अशा महिलांना एकत्र आणून त्यांना बोलते केले, त्यांचे मन मोकळे केले. शिवाय एकटेपणापोटी येणाऱ्या संकटांवर यशस्वीपणे मात करण्याची प्रेरणा, सामर्थ्यही दिले.
निर्मल यांच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवातच मुळी खडतर ठरली. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षीच त्यांना वैधव्य आले. त्यासाठी त्यांनाच अपशकुनी ठरविण्यात आले. त्यानंतर त्यांनी सासरी एक वर्ष मोठ्या खडतर स्थितीत काढले.
अतिरेक झाला त्यावेळी त्यांच्या मनात आत्महत्येसारखा विचारही आला. मात्र, त्यांनी मोठ्या हिमतीने पुढील आयुष्याला सामोरे जाण्याचे ठरविले. त्यांनी हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील सरकाघाट येथे “सोशल अपलिफ्टमेंट थ्रू रूरल ऍक्शन’ म्हणजे “सूत्र’ या उपक्रमाची सुरुवात केली.
“सूत्र’च्या माध्यमातून महिलांसाठी समाजकार्य सुरू केले. एकाकी आयुष्य काढणाऱ्या महिलांना त्यांनी एकत्र आणून त्यांच्या अन्यायाला वाचा फोडली. राजस्थानच्या महिलांसाठी “एकल नारी शक्ती’ संघटनेचे कार्य सुरू केले. त्यांच्या या कार्याची शासन दरबारी नोंद घेतली गेली. याचाच परिणाम म्हणून या दोन्ही राज्यांत एकाकी व गरजू महिलांसाठी “मदर तेरेसा आश्रय-मैत्री संबल योजना’ अमलात आली आहे.
सुरुवातीला हिमाचल प्रदेशमध्ये त्यांच्या संघटनेत केवळ 120 महिला सदस्या होत्या. आज हा आकडा 16 हजार झाला आहे. तसेच त्यांच्या संघटनेचे काम तब्बल 14 राज्यांमध्ये पसरले असून राष्ट्रीय स्तरावर संघटनेत 1 लाख 35 हजार महिला सदस्य आहेत.