हरिद्वार -आम्ही गुन्हा केला असेल तर आम्हाला गोळ्या घाला. छाती पुढे करू पण पाठ दाखवणार नाही, अशा शब्दात कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपला संताप व्यक्त केला आहे. नव्या संसद भवनासमोर निदर्शने करण्यासाठी निघालेल्या कुस्तीपटूंना पोलिसांनी जबरदस्तीने बसमध्ये कोंबले व त्याना अटक केली. त्यानंतर गुन्हेही दाखल केले.
त्यानंतर मंगळवारी काही कुस्तीपटूंची सुटका करण्यात आली. यावेळी माध्यमांसमोर आपली कैफियत मांडताना पुनियाला संताप अनावर होत होता. इंडिया गेटजवळ उपोषणही सुरू करणार आहोत, असा इशाराही बजरंगसह विनेश फोगट व साक्षी मलिक यांनी दिला.
आम्ही गुन्हेगार नाही मात्र, आम्हाला तशी वागणूक दिली जात आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून आमचे जबाब नोंदवून घेतले गेले मात्र, पुढे काहीही कारवाई झालेली नाही. अद्याप ब्रिजभूषण यांना अटक झालेली नाही. जर अशीच वागमूक आम्हाला मिळणार असेल तर अन्न पाणी न घेता इंडिया गेटजवळ उपोषणही करणार आहोत, असे विनेश फोटगने सांगितले.
जंतर मंतरवर हे कुस्तीपटू गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त दिवस आंदोलन करत आहेत. त्यांना सरकारकडून कोणतेही ठोस आस्वासन अद्याप मिळालेले नाही. भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करण्याची मागणी करत हे आंदोलन सुरु झाले आहे. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी गुन्हाही दाखल झालेला आहे मात्र, अद्याप त्यांना अटक झालेली नाही. याच मागणीसाठी सरकारचे व संपूर्ण देशाचे लक्ष वेधण्यासाठी हे कुस्तीपटू नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्याच दिवशी तेथे आंदोलन करणार होते. मात्र, त्यापूर्वीच दिल्ली पोलीसांनी त्यांची धरपकड केली.
बजरंगचीही सुटका
पोलिसांनी महिला कुस्तीपटू विनेश फोगट, संगीता फोगट व साक्षी मलिक यांना सोडले होते. मात्र, बजरंगसह अन्य तीन पुरुष कुस्तीपटूंना कोठडीतच ठेवण्यात आले होते. त्यांनाही मंगळवारी सोडण्यात आले. शेतकरी संघटना याबाबत आक्रमक झाली असून कुस्तीपटूंना न्याय दिला नाही तर, दिल्लीचा दूध व भाजीपाला रोखू असा इशाराही दिला आहे.
कुस्तीपटू हरिद्वारमध्ये दाखल; पण…
पवित्र गंगा नदीमध्ये पदके अर्पण करण्यासाठी कुस्तीपटू हरिद्वारमध्ये दाखल झाले होते. मात्र, त्यांनी पदके नदीत अर्पण करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्यांनी सरकारला पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या पाच दिवसांत ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई झाली नाही किंवा त्यांना अटक केली नाही तर उपोषण सुरू करू, असा इशाराही दिला आहे.
विनेश फोगट, संगीता फोगट, साक्षी मलिक यांच्यासह बजरंगही हरिद्वारमध्ये दाखल झाला आहे. देशासाठी कठोर मेहनत घेत पदके मिळवली मात्र, अन्याय होत असताना सरकारने कोणतीही दखल घेतली नाही, असे बजरंगने सांगितले. जे खेळाडू देशासाठी पदके मिळवतात, त्यांच्यावर होत असलेला अन्याय कोणाला कसा दिसत नाही, असे विनेशने सांगितले.