मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. 29 ) रात्री उशिरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये शिवतीर्थावर तासाभराहून अधिक वेळ चर्चा झाली. त्यामुळे भाजप व शिंदे गटाची आगामी निवडणुकींची राजकीय समीकरणे ही शिवतीर्थावर ठरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अशात फडणवीस यांनी मात्र राज ठाकरेंसोबतच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे सांगत भेटीबाबत अधिक माहिती देणे टाळले आहे. शिवतीर्थावर राज ठाकरेंसोबत नेमकी काय चर्चा झाली?, असे पत्रकारांनी विचारले असता, “आम्हा दोघांचे बऱ्याच दिवसांपासून भेटण्याचे ठरले होते. मात्र, मुहूर्त निघत नव्हता. काल अखेर तो मुहूर्त निघाला,’ असे फडणवीसांनी म्हटले आहे.
फडणवीस पुढे म्हणाले, राज ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. राजकीय विषय सोडून बोलायचे असे आमचे ठरले होते. आम्हाला केवळ गप्पा मारायच्या होत्या. यावर पत्रकारांनी आगामी मुंबई पालिकेच्या निवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे, असे सांगताच फडणवीस म्हणाले, तुम्हाला काय चालवायचे आहे ते तुम्ही चालवू शकता ना. माझी कोणतीच हरकत नाही.
ठाकरे गट अस्वस्थ
राज्यात सध्या शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाची महाविकास आघाडी आहे. येत्या सर्व निवणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार, असे वक्तव्य मविआचे नेते करत आहेत. त्यामुळे भाजप व शिंदेंच्या शिवसेनेसमोर तगडे आव्हान उभे राहीले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते व भाजप नेते वारंवार राज ठाकरेंची भेट घेत आहेत.
आगामी निवडणुकांची राजकीय समीकरणे ठरवण्यासाठीच या भेटी होत असल्याच्या चर्चा आहेत. त्यात फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले, सध्या संपूर्ण ठाकरे गट व राष्ट्रवादी कॉंग्रेस अस्वस्थ आहे. तीन, चार लोकांमुळे या पक्षामधील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भविष्यात हे सर्व लक्षात येईल.