आळंदी – तीर्थक्षेत्र देहू, आळंदीतून वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणीला गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. इंद्रायणी काठावरील बहुतांश गावांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणीत सोडले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कंपन्यांचे केमिकल मिश्रित पाणी थेट इंद्रायणी पात्रात सोडल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. आषाढी कार्तिकी यात्रा, संत तुकाराम बिज तसेच वर्षभर देहू-आळंदीला येणाऱ्या भाविकांना याच प्रदूषित पाण्यात अंघोळ करावी लागते. परिणामी भाविकांना अनेकदा त्वचा रोगांचे समस्यांनाही सामोरे जावे लागते. तसेच या दुषित पाण्याचा इंद्रायणी काठावरील गावांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सामाजिक सेवाभावी संस्था, आळंदीकर नागरिक, वारकरी मंडळींनी अनेकदा आंदोलने करुन सरकारचे लक्ष वेधले आहे. वेळोवेळी सरकारकडून इंद्रायणी प्रदूषण मुक्तीची आश्वासने दिली जातात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनीही इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी आश्वासने दिली. इतर कामांसाठी तातडीने निधी मंजूर करुन कार्यवाही होते, मात्र इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी उपाययोजना करण्यात सरकार उदासीन असल्याचे दिसते. केवळ बैठका घेऊन निधीचे आकडे आणि प्रकल्प अहवाल राज्य शासन, केंद्र सरकारला पाठविल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही होऊन इंद्रायणी प्रदूषणमुक्त कधी होईल याची सर्वजण वाट पाहत आहेत.
सेवाभावी संस्थांकडून परिक्रमा, पदयात्रांमधून जनजागृती –
दरम्यान, एकीकडे शासन स्तरावर इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी हालचाली सुरु असताना दुसरीकडे विविध सेवाभावी संस्थांकडून इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी इंद्रायणी परिक्रमा, पदयात्रा, सायकल यात्रांमधून पर्यावरण संवर्धन करण्याबाबत जनजागृती केली जात आहे.
नुकतीच ह.भ.प. गजानन महाराज लाहुडकर यांनी 17 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान इंद्रायणी उगमस्थळ कुरवंडे ते संगमस्थळ तुळापूर असा पायी परिक्रमा पालखी सोहळा काढला होता. यात शंभराहून अधिक लोक सहभागी झाले होते. यामध्ये भजन, कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
31 डिसेंबर रोजी पिंपरी-चिंचवड शहर, देहू, आळंदी पंचक्रोशीतील विविध पर्यावरण प्रेमी सेवाभावी संस्थांच्या वतीने देहू ते आळंदी पर्यावरण जागृती व नववर्ष संकल्प पदयात्रा काढण्यात आली. नमामी इंद्रायणी प्रतिष्ठान, इंद्रायणी सेवा फाउंडेशन, आळंदी जनहित फाउंडेशन, श्री आळंदी धाम सेवा समिती यासंह विविध सेवाभावी संस्थांकडून इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.