नीलकंठ मोहिते
इंदापूर -देशासह राज्यात सध्या मशिदींवरील राजकारण पेटलेले आहे. या भोंग्यांच्या आवाजापेक्षा सामान्य जनतेला माफक दरात जीवनावश्यक वस्तू आवश्यक असताना, वाढलेल्या महागाईचा आक्रोश सरकारने ऐकावा. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ईदनंतर मशिदीवरील भोंगे काढले नाही, तर देशभरातील मशिदींसमोर भोंग्यावरुन हनुमान चालिसा म्हणणार, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले. खरं तर वाढत्या महागाईबाबत केंद्र शासनात बसलेल्या लोकप्रतिनिधींना भोंग्यातून माहिती देत गोरगरिबांचे होणाऱ्यांचे हाल सांगणे गरजेचे आहे, असेच शब्द इंदापूर तालुक्यातील घराघरांतून बोलले जात आहे.
पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल व इतर महागाईमुळे सामान्य जनतेच्या मनात खदखदणारा आवाज कुठेतरी जाती-धर्माच्या नावावर दाबला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कधी मंदिर तर कधी भोंगे, राजकारणासाठी मुक्तपणे वापरत सत्तेचा उपभोग सतत घेण्यात आला. राजकारणाच्या या कलुषित उद्देशाने मात्र सामान्य जनता होरपळून निघाली. एकीकडे राज्यातील अनेक गाव- खेड्यांसह शहरी भागात अनेक जाती-पंथाचे नागरिक शेजार धर्म पाळत गुण्यागोविंदाने राहतात.
हिंदूची दिनचर्या मशिदीच्या आवाजाचा कल घेत सुरू होते. तर अनेक मुस्लिमांची रोजीरोटी मंदिरातील हारविक्री करण्यापासून प्रारंभ होते. कुठलेच मनभेद नसताना केवळ राजकीय स्वार्थापोटी भोंग्याचे राजकारण केले जात आहे. या राजकारणात चेतावणी देणाऱ्या कुठल्याही पक्षाच्या नेत्यांची मुले, नातेवाईक भोंगा लावण्यासाठी पुढाकार घेताना दिसून येत नाही. गोवली जातात ते केवळ सामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांची, शेतमजुरांची लेकरं. म्हणून या नेत्यांच्या चेतावणीला समजून-उमजून घेत युवापिढींनी सजग राहणे गरजेचे आहे.
एकीकडे सामान्य कुटूंब महागाईने होरपळत आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य मूल्य नाही; मात्र डीझेल दराच्या वाढीने शेतीची मशागत महागत आहे. सामान्यांच्या भाजीत तेलाऐवजी पाणी घालण्याची वेळ आली आहे. सामान्यांच्या जीवनावश्यक बाबींकडे दुर्लक्ष होऊन महागाईची बोंबाट्यापेक्षा भोंग्याचा आवाज वरचढ ठरणे, या भारतीय लोकशाहीला घातक ठरणारी आहे. म्हणून सामान्य कुटुंबातील युवापिढींनी भोंग्याच्या राजकारणाचा हेतू ओळखून वेळेत सावध राहणे गरजेचे आहे.
गुण्यागोविंदाचे वातावरण
राज्याचे व देशाचे राजकारण वेगळ्या मार्गाने चालले तरीदेखील, जाती धर्माचे बंधने इंदापूर तालुक्याने मागील काही कालावधीतच तोडली आहेत. त्यामुळे सर्व धर्म समभाव ही संकल्पना तालुक्यातील गावागावात कायम आहे. त्यामुळे भोंग्याचे राजकारण इंदापूर तालुक्यात पसरलेले दिसत नाही; मात्र हे राजकारण गोरगरिबांची चूल पेटवण्यासाठी मोठी अडचण करणारे ठरत आहे.