बाळासाहेब कवळे
कुरवली- इंदापूर तालुक्यातील 22 गावामध्ये पिण्याच्या – पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न लोंबकळत आहे. तालुक्यात पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण असताना पाणीटंचाईचा आढावा आमदार-खासदार का घेत नाही, याबाबत तालुक्यात नागरिकांमध्ये नाराजी आहे.
आजच्या घडीला पारा 40 अंशांवर पोहोचला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच कडक उन्ह तापायला लागल्याने, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संपूर्ण मार्च निघून गेला असताना पाणी टंचाईवर उपाय योजनेची कामे हाती घेण्याकरीता व कोणत्या गावात किती प्रमाणात पाणी टंचाई आहे, याची माहिती घेण्याकरीता खासदार, आमदारांनी आढावा बैठक लावलेली नाही.
तालुक्यातील 140 गावांपैकी कित्येक गावे पाण्यावाचून तहानलेली आहेत. इंदापूर पंचायत समितीमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उन्हाळ्याच्या प्रारंभी एक बैठक घेतली; मात्र त्यावेळेस तालुक्यातील पाण्याची इतकी विदारक अवस्था नव्हती. आत्ता सद्यस्थितीला नागरिकांना पाणी- पाणी करण्याची वेळ आली आहे.
प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी पाणी टंचाईची कामे आपल्याच मनमर्जीने करतांना दिसून येत आहे. तसे तर आता माझी लढाई इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्यासंदर्भात आहे. शेतीला व नागरिकांना मुबलक पाणी देणार? महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार, असे जाहीर सभेत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे सांगत आहेत; मात्र आता उन्हाळ्यात लाहीलाही झाली आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कालावधीत उन्हाळ्याचे दिवस येणे अगोदरच इंदापूर तालुक्यातील गावागावात पाणीटंचाई यासंदर्भात कार्यकर्त्यांमार्फत रिपोर्ट गोळा केले जायचे व वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात तातडीने सूचना देऊन पाणी प्रश्न मिटवला जायचा.
झुलवत ठेवू नका
इंदापूर तालुक्याचे लोकपतिनिधी असंवेदनशिलपणा दाखवित असल्याने सामान्य नागरिकांच्या गैरसोयी वाढताहेत, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे नेते करीत आहेत. खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात जसे विकास कामासाठी निधी देताना, अधिकचे लक्ष दिले आहे. तसेच पाणी प्रश्नाविषयी लक्ष द्यावे उगीच पाणी देतो, असे म्हणून लोकांना झुलवणे बंद करावे, असे 22 गावांतील शेतकरी म्हणत आहेत.