नवी दिल्ली – किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर जून महिन्यामध्ये 7.01% इतका मोजला गेला आहे. मे महिन्यामध्ये महागाईचा हा दर 7.04% इतका होता. रिझर्व्ह बॅंकेने महागाई 4% च्या आत रोखण्याचा संकल्प केला असूनही अनेक महिन्यापासून या महागाईचा दर उच्च पातळीवर आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने गेल्या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्याजदर वाढ केली आहे. आगामी काळातही काही महिने या महागाईचा दर उच्च पातळीवर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असून रिझर्व्ह बॅंकेने आणखी व्याजदरात वाढ करण्याची शक्यता यामुळे खुली ठेवली आहे.
ऑक्टोबर महिन्यानंतर या मागायचा दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असल्याचे गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले आहे. जून महिन्यामध्ये डाळी आणि भाज्याचे दर काही प्रमाणात कमी झाल्यामुळे या महागाईचा दर किंचित प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये या महागाईचा जर 6.26 टक्के होता. महागाई जास्त असल्यामुळे 4 मे पासून रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरामध्ये दोन टप्प्यात 0.90% ची वाढ केली आहे. अमेरिकेने व्याजदरात वाढ केल्यामुळे डॉलर वधारला आहे.
त्यामुळे भारताला आयात महागात पडत आहे. त्याचबरोबर रशिय- युक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाल्यामुळे भारताला आयात महागात पडत आहे. या कारणामुळे सध्या महागाईचा दर जास्त असल्याचे दास यांनी सांगितले होते.
मात्र भारतामध्ये पाऊस समाधानकारक पडत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये काही प्रमाणात महागाई कमी होण्यास या घडामोडीचा उपयोग होणार असल्याचे सांगण्यात येते. महागाई वाढल्यानंतर सर्वसामान्य लोकांचा आर्थिक संस्थांवरील विश्वास कमी होतो. त्यासाठी महागाई योग्य पातळीवर कमी ठेवणे हे आमचे कर्तव्य असल्याचे दास यांनी सांगितले होते.