नवी दिल्ली – अपेक्षेप्रमाणे एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा दर वाढवून 15.08 टक्के नोंदला गेला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात केलेली वाढ योग्य होती असे सिद्ध झाले आहे. एप्रिल महिन्यात फळे, भाजीपाला आणि इंधनाच्या किमतीत वाढ झाली. गेल्या 13 महिन्यापासून घाऊक महागाईचा दर जास्त आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत ही आकडेवारी जास्त भासत आहे या युक्तिवादाला आता अर्थ उरलेला नाही. अन्नधान्यांबरोबरच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील वस्तूच्या किमतही वाढल्या आहेत. त्यामुळे घाऊक महागाईचा पाया विस्तारित झाले. अशा परिस्थितीमध्ये महागाई नजीकच्या भविष्यात कमी होण्याची शक्यता मावळली आहे.
वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे की, धातु, पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू, रसायने इत्यादी वस्तूंच्या किमतीत वाढ झाली. अन्नधान्याच्या किमती 8.35 टक्क्यानी, भाजीपाल्याच्या किमती 23 टक्क्यांनी वाढल्या. बटाट्याच्या किमती 20 टक्क्यांनी, फळांच्या किमती 11 टक्क्यांनी तर गव्हाच्या किमती 11 टक्क्यांनी वाढल्या आहेत. घाऊक महागाईचा वाढणार आहे याचा अंदाज रिझर्व्ह बॅंकेला आला होता. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने अचानक गेल्या पंधरवड्यात पतधोरण समितीची बैठक घेऊन रेपो दरामध्ये 0.40 टक्क्यांची वाढ केली होती.
जून महिन्यात नियमित पतधोरण बैठकीवेळी अशाच प्रकारची मोठी दरवाढ केली जाण्याची शक्यता आहे. क्रिसील या संस्थेच्या अर्थतज्ञ आदिती नायर यांनी सांगितले की, जून महिन्यात रिझर्व बॅंक त्याच दरामध्ये 0.40 टक्क्याची आणि ऑगस्ट महिन्यात 0. 35 टक्क्याची वाढ करण्याची शक्यता आहे. केवळ भारतातच नाही तर अमेरिका आणि युरोपमध्ये महागाईचा भडका उडाल्यामुळे तेथील रिझर्व्ह बॅंकानी व्याजदरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. गेल्याच आठवड्यामध्ये अमेरिकेतील महागाई उच्च पातळीवर कायम असल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे तेथील रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. युद्धामुळे जागतिक महागाईवर आणखी परिणाम झाला आहे.