केरळ, आसाममधील पुराचा फटका
प्रति किलो 80 ते 100 रुपयांनी भाववाढ
पुणे – भारतीयांचे आवडते पेय म्हणजे चहा…यावर्षी करोना संसर्गामुळे नेहमीच्या तुलनेत चहाची लागवड कमी झाली आहे. त्यानंतर आसाम, केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे चहाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे चहा पावडरच्या भावात किलोमागे प्रतवारीनुसार 80 ते 100 रुपयांनी वाढ झाली आहे.
चहाचे उत्पादन कमी झाल्याने यंदा चहाचे भाव तेजीतच राहणार आहेत. करोनाचा संसर्ग तसेच लॉकडाऊनमुळे चहाला मागणी कमी होती. अनलॉक सुरू झाल्यानंतर आता चहाची दुकाने सुरू झाली आहेत. अद्याप अमृततुल्य चालकांकडून चहाचे भाव वाढवण्यात आले नसले, तरी सामान्यांसह अमृततुल्य चालकांना चहा पावडरचे भाव वाढल्याने झळ सोसावी लागणार आहे. वर्षभर चहा पावडरला चांगली मागणी असते. विशेषत: थंडी आणि पावसाळ्यात चहा पावडरच्या मागणीत मोठी वाढ होते, अशी माहिती भवानी पेठ भुसार बाजारातील प्रमुख चहा पावडर विक्रेते विजय गुजराथी यांनी दिली.
आसाम, केरळ ही दोन्ही राज्ये संपूर्ण देशाची चहाची गरज भागवतात. दक्षिणेकडील राज्यांच्या तुलनेत आसामधील चहा अधिक दर्जेदार समजला जातो. शहरी भागातील ग्राहक आसाम, दार्जिंलिग येथील सीटीसी लिफ चहा वापर करतात. या चहा पावडरचे दर जास्त असतात.
ग्रामीण भागातील ग्राहकांकडून डस्ट पावडरला मागणी असते. या चहाचे भाव कमी असतात. एक किलो चहा पत्तीचे (सीटीसी लिफ) भाव पूर्वी प्रतवारीनुसार 180 ते 350 रुपये असे होते. आता एक किलोचे भाव 390 ते 480 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. डस्ट चहा दक्षिणेकडील राज्यातून विक्रीस पाठविण्यात येतो. पूर्वी डस्ट प्रतिकिलो 180 ते 200 रुपये असे होते. त्यामध्ये 80 ते 100 रुपयांनी वाढ झाली आहे.