बदलत्या हवामानाचा मका, बाजरी पिकाला फटका ः उत्पादन घटणार
यवत- बदलत्या हवामानामुळे दौंड तालुक्यातील काही भागांत खरिपाच्या पेरण्या केलेल्या बाजरी व मका पिकांवर लष्करी आळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी वर्गाने वेळीच उपाययोजना न केल्यास उत्पादन घटण्याची श्यक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गावर एक नवीन संकट उभे राहिले आहे.
गेल्या वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने धरण क्षेत्र वगळता कोठेच पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन खरीपासह रब्बीचा हंगाम वाया गेला होता. या वर्षी पाऊस एक महिना उशिरा येऊनही पेरण्यायोग्य पाऊस झाल्याने दौंड तालुक्यातील काही भागांत शेतकरी वर्गाने खरिपाच्या पेरण्या केल्या.
मात्र, बाजरी आणि मक्याच्या पिकावर या वर्षी लष्करी आळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे, त्यामुळे ही लष्करी आळी मका व बाजरीच्या पिकाच्या गाभ्यात या आळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून ही आळी गाभा खात असल्याने ते पीक पिवळे पडून या आळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हाता तोंडाशी आलेले पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांवर हजारो रुपये खर्च करून पिकांवर प्रतिबंधात्मक औषधे फवारणी करण्याची वेळ आली आहे.
- यापूर्वी मका पिकावर अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव दिसून येत होता. मात्र, या वर्षापासून बाजरी पिकांवर या आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. एक पतंग एका वेळी हजार ते पंधराशे अंडी घालतो आणि एका रात्रीत 100 किलोमीटरपर्यंत प्रवास करतो. त्यामुळे या लष्करी आळींचा मोठ्या प्रमाणात पिकांवर प्रादुर्भाव होताना दिसत आहे. या लष्करी आळींवर नियंत्रण मिळविण्यासाठी निमार्क हे औषध एक लिटर पाण्यात पाच एमएल मिसळून फवारणी करावी, तसेच बुरशीनाशकांसाठी मेटराईझियम व दिवेरीया या प्रतिबंधक औषधांची फवारणी शेतकरी वर्गाने करणे गरजेचे आहे.
– महेश रूपनवर, तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा), दौंड तालुका