राजगुरुनगर-खेड घाटातील इंदिरा पाझर तलाव 100 भरल्याने शेतकरी सुखावला आहे. या तलावातून पाणी पुरवठा होणारे सांडभोरवाडी, तिन्हेवाडी, पेठ, या गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात सर्वच धरणे भरली आहेत; मात्र खेड तालुक्यातील धरणे अजूनही भरली नसली तरी त्यात भरण्याइतका पाणीसाठा झाला आहे. मागील आठवड्यात भीमाशंकर परिसरात जोराचा पाऊस झाल्याने भामा आसखेड, चास कमान धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
दोन्ही धरणांत 90 टक्क्यांच्या आसपास साठा झाला आहे. तर कळमोडी धरण 100 टक्के भरले आहे. तर मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील विविध गावातील पाझर तलाव, शेततळी आणि विहिरी भरल्या आहेत.
खेड तालुक्यातील कडूस मिनी धरण, राजगुरुनगरचा इंदिरा पाझर तलाव, जैदवाडी, रेटवडी, टोकावडे, गुळाणी, पाईट परिसरातील तलाव जवळपास भरले आहेत यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई हटली आहे.
दरम्यान, खेड घाटातील इंदिरा पाझर तलाव फुल्ल भरला असल्याने तो पाहण्यासाठी व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. मात्र, करोनामुळे वर्षा विहारास यंदा बंदी असल्याने हौशी पर्यटकांनी येथे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.