– ममता संजय मुनगिलवार
पाऊस आणि भटकंती ह्याच एक अजोड नात आहे. त्यात ही निसर्ग सान्निध्य, गड किल्ले, हिरवे गार डोंगर असं हव असेल तर मग काय? गाठा सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्याच्या झोळीत जणू निसर्गानीच आपल्या मुक्त हस्तांनी निसर्ग सौंदर्याचं भरभरुन वरदान टाकलंय. हिरव्यागार डोंगरदऱ्या,घनदाट जंगले, मुबलक पाणी, आणि काळीशार जमीन. फळाची, फुलांची झाडी असंण् सारं काही..
पण आज आपण पाहणार आहोत, सातारा जिल्ह्याला निसर्गानी बहाल केलेला, “साताऱ्याचा मानबिंदू’ म्हणजेच भाम्बवली वजराई धबधबा. हा धबधबा म्हणजे स्वर्गीय स्थान आहे. चहूबाजुनी, हिरव्याशार झाडाझुडपांनी नटलले ऊंचच ऊंच डोगर, सुखद थंड हवा, घनदाट जंगल आणि मंत्रमुग्ध करत वेगानं येणारं पाणी. दुधाळ रंगाचं ते ऐश्वर्य तीन ट्प्प्यात वेगाने खाली येते.
साताऱ्यापासून पश्चिमेला 25 ते 30 किमी आणि फुलांच्या कास पठारापासून अवघ्या तीन किमी अंतरावर ताम्बी हे चिमुकलं गाव लागतं. त्या गावापासून छोट्याशा पाय वाटेने हा ट्रेक सुरु होतो. दगड धोंड्या तून जाणारी थोडीशी निसरडी अशी पाऊल वाट, वळणा वळणावर खळाळणारे छोटे निर्झर, झरे, दोन्ही बाजूनी थोडी शेती ,जंगल, आणि वर पाहिल्यावर जणू आकाशच डोंगरावर उतरलेय असा भास. अद्भूत असं वातावरण. ट्रेकिंगचा मस्त अनुभव घेत साधारण तासभरात आपण धबधब्याच्या जवळ पोहचतो. त्याचं विहंगम आणि भव्य रुप पाहूनच स्वर्गीय सुखाचा आनंद होतो.
भारतातील सर्वात ऊंच धबधबा अशी ख्याती असलेला हा 1840 फुट उंचीचा धबधबा आहे. महत्वाचं म्हणजे तो बारमाही आहे. कास तलावातून उगम पावणारी उरमोडी नदी डोंगरकड्यावरुन दरीत झेपावतो, तोच हा धबधबा होय. गर्द हिरवाई, पक्षांचा किलबिलाट, आणि निरव शांतता अनुभवायची असेल तर वजराई अर्थात भाम्बवलीच्या धबधब्यास एकदा भेट द्यायला हरकत नाही.
आमचा अनुभव तर अविस्मरणीय असा होता. धबधब्याच्या विशालतेमुळे तर होताच पण तिथल्या स्थानिक लोकांना बघून भेटून फारच आनंद झाला. ट्रेक करुन परत ताम्बीला आलो आणि एका अगंणा त थोडसं टेकलो. पाणी पिऊन वर कारमध्ये जाऊन बसू, असा विचार. तेवढयात त्या घरातून एक आजोबा बाहेर आले, आणि त्यानी सहज विचारल पाणी देवू का, बसा वर येऊन.
आम्ही शहरी लोक दारातूनच बाहेर बघणारे अशा जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरुला पाणी विचारायची आपली संस्कृती कधीच विसरलो नाही का? पाणी तर माझ्या जवळ होतंच; पण माणुसकीची भावना लगेच चमकून गेली. मग काय गप्पा मारायला बस्तान ठोकलं ना आम्ही. शेजारच्या एकीने शेंगा दिल्या भाजलेल्या, मग फणस आणला कापुन, आणि बोलताना कळलं ते मागे वीस वर्ष गावचे पाटील होते. दरीत खाली नजरेत येईल तेवढी जमीन त्यांचीच, आता वयोमानानुसार शेती करण होत नाही, तरिही त्यांच्या आत भिनलेल्या आदर आतिथ्य, पाहुणचार करण्याचे संस्कार काही जात नाहीत, हे मी आता माझ्या मनात म्हंटल.!!
तेवढयात एक आजी बाई बाहेर आल्या. वय वर्ष 75 च्या पुढेच, आंतर्बाह्य मूर्तिमंत महाराष्ट्रीयन सौंदर्यंच, वागण्यात अदब. गावची पाटलीनच ती. मग काय, आजीबाईनी तर चहा पण करुन पाजला. त्याचीच जोडीदारीण ती. असा मस्त पाहुणचार घेतला. सांगण्याचा उद्देश असा की, फक्त धबधबाच ऊंच नाही तर सामन्य माणसं पण त्याच उंचीची आहेत.
पण भेट देताना..
1. प्लास्टिकमुक्त क्षेत्र आहे, आपल्यामुळे निसर्ग सौंदर्याची हानी होणार नाही हे जरुर पहा.
2. धबधब्या जवळील किमीपर्यंत मांसाहार करण्यास प्रतिबंध.
3. तिथे पोहता येणार नाही, डोळ्यांनीच निसर्गसौंदर्य अनुभवा
- जंगली प्राणी आहेतच, महत्वाच म्हणजे जळू पण आहेत.
- शक्य तर सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंतच जाऊन या.
- ज्यांना ट्रेक करण शक्य नाही, अशा पर्यटकांसाठी पायवाट, पायऱ्या, रेलींग, टॉवर गॅलरी, अशी सोय पण केलेली आहे.
- गाईड, मार्गदर्शक अशी नको ती गर्दी नाही.