नवी दिल्ली – “भाजप-आरएसएसला फक्त सत्ता हवी आहे. सत्ता मिळवण्यासाठी ते मणिपूर जाळतील, संपूर्ण देशही जाळतील. त्यांना देशाच्या दु:खाची पर्वा नाही. केवळ निवडक लोकांनी देश चालवावा आणि देशाची संपत्ती त्यांच्या हातात असावी अशी त्यांची इच्छा आहे,’ असे म्हणत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूर प्रश्नावर शांत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्हिडिओद्वारे निशाणा साधला आहे.
संसदेत मणिपूरवर चर्चेसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विषयावर बोलण्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झालेले आहेत त्यांत खासदारकी रद्द झाल्याने संसदेत बोलण्यास मुकलेल्या राहुल यांनी ट्विटरचा आधार घेतला आहे. व्हिडिओमध्ये राहुल पुढे म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरसाठी काय करत आहेत? ते मणिपूरबद्दल काहीच का बोलत नाहीत? कारण, नरेंद्र मोदींचा मणिपूरशी काहीही संबंधच नाही. त्यांच्या विचारसरणीमुळे मणिपूर जळाले हे त्यांना चांगलेच माहीत आहे.
“भारत जोडो यात्रे’मध्ये एक नारा निघाला होता. “द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडायचे आहे. त्यांनी (भाजप) द्वेष पसरवला तरी तुम्ही तिथे जाऊन प्रेमाचे दुकान उघडा. त्याचसाठी आमच्या विरोधी आघाडीने “इंडिया’ हे नाव निवडले. हे नाव आमच्या हृदयातून बाहेर पडले आहे; परंतु आम्ही हे नाव निवडताच नरेंद्र मोदीजी “इंडिया’ला शिव्या देऊ लागले. मोदीजींना इतका अहंकार आहे की ते “इंडिया’ या पवित्र शब्दाला शिवी देत आहे, असेही राहुल यांनी पुढे म्हटले.
तुमच्या हृदयात देशभक्ती असेल तर, देशातील कोणत्याही नागरिकाला दुःख झाल्यास तुम्हालाही दुःख होईल. मात्र, भाजप-आरएसएसच्या लोकांना काहीच वेदना होत नाही, कारण, ते भारताचे विभाजन करण्याचे काम करत आहेत, असेही अखेरीस राहुल यांनी म्हटले.
“इंडिया’चे शिष्टमंडळ मणिपूरला जाणार
लोकसभेतील कॉंग्रेसचे व्हिप मणिकम टागोर म्हणाले की, विरोधी पक्षांच्या 20 हून अधिक खासदारांचे एक शिष्टमंडळ या आठवड्यात मणिपूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकताच मणिपूरचा दौरा केला. तत्पूर्वी, मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून संसदेत सुरू असलेल्या गतिरोधादरम्यान कॉंग्रेसने बुधवारी लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. ज्यावर सभागृहात चर्चेसाठी मंजुरी देण्यात आली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून या प्रस्तावावर चर्चेची तारीख ठरवणार आहेत.