भारताच्या खेळातल्या कामगिरीबाबत खंत
सोलापूर – भारत 130 कोटींचा देश आहे. मात्र क्रीडाप्रकारात मागे असून फक्त भाषणबाजीत पुढे असल्याची खंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली. ते सोलापुरात बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात 23 व्या आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांचे आयोजन राज्यपालांचे हस्ते करण्यात आले. यावेळ राज्यातील जवळपास 20 विद्यापीठातील 3 हजार विद्यार्थी विविध स्पर्धांसाठी सोलापूर विद्यापीठात दाखल झाले आहेत.
पुढील तीन दिवस या स्पर्धांचे आयोजन सोलापूर द्य्िापीठात करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रासह भारताच्या खेळातल्या कामगिरीबाबत खंत व्यक्त केली. 1952 नंतर देशाने बोटावर मोजण्याइतकेच पदकं मिळवले. त्यातही महाराष्ट्राची कामगिरी अंत्यत सुमार असल्याचे विधान त्यांनी केले. तर राज्याला अशा क्रीडा स्पर्धातून चांगले खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास कोश्यारी यांनी व्यक्त केला.
क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमात सुत्रसंचालन संस्कृतमधून करण्यात आले. यावरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कुलगुरुंचे कौतुक केले. संस्कृत भाषा लोप पावत चालली आहे. अशात संस्कृतमधून सुत्रसंचालन केल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. तर उपस्थित पाहुण्यापैकी कोणीच मराठीत भाषण केले नाही यावरुन राज्यपालांनी कानपिचक्याही काढल्या.
मी उत्तराखंडमधून आल्यानंतर मराठीत शपथ घेतली. ज्याची चर्चा सर्व माध्यमातून झाली. मात्र, यात विशेष काही नाही, महाराष्ट्रात असाल तर मराठी शिकणे गरजेचे आहे. मात्र, या कार्यक्रमात कोणीच मराठीत भाषण केले नाही. कुलगुरुंनीही इंग्रजीत भाषण केले. किमान आभार तरी मराठीत मानावे, असे म्हणत कोश्यारी यांनी चिमटे काढले.