पोर्टलुईस – मॉरिशसजवळच्या समुद्रात ज्या जहाजातून हजारो लीटर तेलाची गळती झाली त्याच्या भारतीय कप्तानास अटक करण्यात आली आहे. एमव्ही वाकाशियो या जपानी जहाजाचा भारतीय कप्तान सुनील कुमार नंदेश्वर असून त्याच्यावर सागरी मार्ग धोक्यात आणल्याचा आरोप ठेवून अटक करण्यात आली.
या जहाजातून हिंदी महासागरातील बेटांच्या परिसरात 1 हजार टन तेलाची गळती झाली होती.
सुनील कुमारच्या जामिनावर पुढील आठवडयात सुनावणी होणार आहे, असे मॉरिशस प्रशासनाने सांगितले आहे. त्याच्यावर अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून हे जहाज प्रवाळ बेटांजवळ अडकून त्यातून तेल गळती झाली त्यामुळे जैवविविधतेची मोठी हानी झाली आहे. हे जहाज 25 जुलैला दुर्घटनाग्रस्त झाले.
नागाशिकी कंपनीचे हे जहाज असून त्याने मार्ग का सोडला याची चौकशी सुरू आहे. मॉरिशस सरकारने कंपनीकडून नुकसान भरपाई मागितली आहे. गळतीपूर्वीच त्यातील तेल बाहेर का काढून घेतले नाही असा प्रश्न विचारला जात आहे.
ज्या भागात ही तेलगळती झाली तो भाग व्हेल माशांच्या प्रजनन क्षेत्रात येतो त्यामुळे याबाबत पर्यावरण रक्षकांनीही आवाज उठवला आहे.