नवी दिल्ली – जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांसोबत भारतीय लष्कराच्या दहशतवादविरोधी ‘ऑपरेशन त्रिनेत्र’ कारवाई दरम्यान पाच जवान शहीद झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तेथील स्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शनिवारी या राज्यात दाखल झाले आहेत. राजौरीच्या कांडी भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीच्या स्थितीचा ते आढावा घेणार आहेत.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी आज सकाळी राजौरी चकमकीत शहीद झालेल्या पाच लष्करी जवानांना श्रद्धांजली वाहिली.लान्स नाईक रुचिन सिंग रावत, पॅराट्रूपर सिद्धांत चेत्री, नाईक अरविंद कुमार, हवालदार नीलम सिंग आणि पॅराट्रूपर प्रमोद नेगी अशी शहीद जवानांची नावे आहेत. भारतीय लष्कर जम्मू प्रदेशातील भाटा धुरियनच्या तोटा गली भागात लष्कराच्या ट्रकवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटाला हुसकावून लावण्यासाठी कार्यरत आहेत.