कॅनबेरा – कर्णधार ऍरन फिंच व ग्लेन मॅक्सवेल यांच्या दमदार फलंदाजीनंतरही यजमान ऑस्ट्रेलियावर भारतीय संघाने 13 धावांनी मात करत एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरील पहिलाच विजय नोंदवताना भारतीय संघाने व्हाइटवॉशची नामुष्कीही टाळली.
या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत यजमान ऑस्ट्रेलियाने ही मालिका यापूर्वीच खिशात टाकली असली तरीही प्रतिष्ठा राखण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे बनले होते. यंदाच्या मोसमात भारतीय संघाने खेळलेल्या सहा सामन्यांत हा पहिलाच विजय ठरला. हार्दिक पांड्या सामनावीर ठरला तर स्टिव्ह स्मिथ मालिकावीर ठरला.
भारतीय संघाने विजयासाठी ठेवलेल्या 303 धावांच्या अव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 49.3 षटकांत 289 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाकडून अॅरोन फिचंने 75(82), ग्लेन मॅक्सवेलने 59(38) आणि अॅलेक्स कॅरीने 38(42) धावांची खेळी केली पण संघास विजय मिळवून देण्यास ते अपयशी ठरले. मागील दोन सामन्यात शतकी खेळी करणारा स्मिथ यावेळी मात्र अपयशी ठरला. त्याला शार्दुल ठाकूरने राहुल करवी झेलबाद केले. तसेच मार्नस लबुशेन केवळ 7 बाद करून बाद ठरला.
भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधित 3 गडी बाद केले. बुमराह व टी. नटराजन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. कुलदीप यादव व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या नाबाद 92(76) धावा व रवींद्र जडेजाची नाबाद 66 (50) वादळी खेळी तसेच कर्णधार कोहलीच्या उपयुक्त 63(78) धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने50 षटकांत 5 बाद 302 धावा केल्या. शिखर धवन 16(27), शुभमन गिल 33(39) आणि के एल राहुल 5(11) मोठी खेळी करून शकले नाही.
ऑस्ट्रेलियाकडून एश्टन एगरने 10 षटकांत 44 धावा देत सर्वाधिक 2 गडी बाद केले. तर अॅडम झम्पा आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.