कोलकता – पश्चिम बंगालमधील प्रभावी नेते सुवेंदू अधिकारी यांची नाराजी दूर झाली नसल्याचे बुधवारी समोर आले. त्यामुळे अधिकारी यांची मनधरणी करण्याचे त्या राज्यातील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसचे प्रयत्न तूर्त तरी निष्फळ ठरले आहेत.
तृणमूलच्या कार्यपद्धतीवरून नाराज झालेल्या अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रिपदाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिला. मोठा जनाधार असणाऱ्या अधिकारी यांचे ते पाऊल तृणमूलसाठी मोठा हादरा ठरले. बंगालमधील विधानसभा निवडणूक अवघ्या पाच-सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे.
त्यामुळे अधिकारी यांच्यासारखा मोहरा गमावणे तृणमूलला राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. त्यातून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न त्या पक्षाकडून सुरू झाले. तृणमूलच्या तीन खासदारांनी मंगळवारी अधिकारी यांची भेट घेतली. त्या बैठकीला तृणमूलची रणनीती आखणारे निवडणूक रणनीतीज्ञ प्रशांत किशोरही उपस्थित होते. त्या बैठकीनंतर सर्व गैरसमज दूर झाले असून अधिकारी तृणमूलसमवेतच राहणार असल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले.
मात्र, तृणमूलचा दावा अधिकारी यांच्या गोटातून फेटाळण्यात आला. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर भूमिका निश्चित करण्यासाठी अधिकारी यांनी काही अवधी मागितला होता. मात्र, सर्व काही आलबेल झाल्याच्या पक्षाच्या दाव्यावर त्यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला आहे. तृणमूलमध्ये कार्य करणे अवघड असल्याची अधिकारी यांची भावना बनल्याचे समजते.
अधिकारी यांच्या गोटातून देण्यात आलेल्या माहितीनंतर तृणमूलनेही त्यांच्याशी आणखी चर्चा होण्याच्या शक्यतेचा इन्कार केला आहे. त्यामुळे तृणमूल आणि अधिकारी यांच्यातील समेटाचे दरवाजे तूर्त तरी बंद झाल्याचे मानले जात आहे. आता अधिकारी यांच्या पुढील राजकीय हालचाली कुतूहलाचा विषय ठरणार आहे.