मेलबर्न – येथे सुरु असलेल्या दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात यजमान ऑस्ट्रेलियावर 131 धावांची आघाडी घेतली असून, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या चहापानापर्यंत 2 बाद 65 धावा झाल्या आहेत.
कालच्या 5 बाद 277 धावांवरुन पुढे खेळताना भारताचा डाव आज सकाळी उपहारापूर्वी 326 धावावर संपला.
कर्णधार अजिंक्य रहाणे कालच्या 104 धावांमध्ये 8 धावांची भर घालू शकला. एक चोरटी धाव घेताना रहाणे धावबाद झाला. याचवेळी रविंद्र जाडेजाने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर जाडेजाही फार काळ टिकला नाही. त्याला 57 धावांवर मिशेल स्टार्कने कमिन्सकरवी झेलबाद केले. मग रविचंद्रन आश्विन (19) आणि उमेश यादव (9) यांनी थोडाफार प्रतिकार केला. बुमराह शून्यावर बाद झाला. तर सिराज नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने 78 धावांत तर नाथन लिऑनने 72 धावांत तीन-तीन विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्सने 80 धावांत 2 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव सुरु केल्यानंतर 4 धावांवर ज्यो बर्न्सचा झेल ऋषभ पंतने घेतला तेव्हा गोलंदाज होता उमेश यादव. नंतर संघाच्या 42 धावा फलकावर लागलेल्या असताना मार्नस लेबुशेनचा झेल अजिंक्य रहाणेने घेतला, त्यावेळी गोलंदाज होता रविचंद्रन आश्विन. लाबुशेनने 28 धावा केल्या. चहापानाला खेळ थांबला त्यावेळी मॅथ्यु वेड आणि स्टीव्हन स्मिथ अनुक्रमे 27 आणि 6 धावांवर खेळत होते. अजूनही ऑस्ट्रेलिया 66 धावांनी पिछाडीवर आहे.