कोलंबो – भारत हा देश सर्वधर्मसमभावाचा आदर्श आहे, असे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांनी म्हटले आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे एका कार्यक्रमात त्यांनी भारताबद्दल हे गौरवोदगार काढले. दलाई लामा व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले होते.
एक शरणार्थी म्हणून भारतात आलो त्यावेळी भारतात अहिंसा आणि धार्मिक सद्भाव, सर्वधर्मसमभाव बघितला. भारतात असलेल्या या बाबी अतिशय उत्कृष्ट अशा आहेत; असे दलाई लामा म्हणाले. भारतीयांच्या अहिंसेच्या विचारांचेही दलाई लामा यांनी कौतुक केले. अहिंसा आणि करुणा यांचा अभ्यास तीन हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू आहे; असे ते म्हणाले.
भारतात जगभरातील वेगवेगळ्या धर्मांचे नागरिक एकत्र वास्तव्य करतात. या देशात हिंदू, इस्लाम, ख्रिस्ती, ज्यू या धर्माचे नागरिक राहतात. धार्मिक विविधता असली तरी देश म्हणून भारत आजही एकसंध आहे. या देशात धार्मिक सद्भावाला महत्त्व आहे.
चिनी आक्रमणानंतर तिबेटमधील नागरिकांनी आश्रयासाठी भारतात प्रवेश केला, त्यावेळी निर्वासितांमध्ये दलाई लामा पण होते. त्यांनी भारतात प्रवेश केल्यानंतर सलग अनेक वर्ष देशातील अहिंसक विचार आणि सर्वधर्मसमभाव बघितला. याआधारे बोलताना दलाई लामा यांनी भारतीय संस्कृतीचे श्रीलंकेतील कार्यक्रमात विशेष कौतुक केले.