मेलबर्न- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कोविड-19 संकटावर फोनवर चर्चा झाली. याबाबत माहिती देताना मॉरिसन यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी कोविड-19 संकटात भारतासोबत उभे राहिल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे आभार मानले. ऑस्ट्रेलिया व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कंसंट्रेटर देऊन भारताला मदत करत आहे. आम्ही करोना लसीच्या निर्यातीमध्ये भारताने दाखवलेली उदारता कधीही विसरु शकणार नाही. जागतिक आव्हानांवर आमचं बारकाईने लक्ष आहे.
भारत सध्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. यात दररोज 3-4 लाख नव्या करोना रुग्णांची नोंद होत आहे. दर दिवशी 3 हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. भारतात सापडलेल्या नव्या करोना विषाणूंच्या व्हेरिएंटमुळे करोना संसर्गाने रौद्र रुप धारण केल्याचे बोलले जात आहे.
2 दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मॅरिस पेनी यांनी ट्विट करत ऑस्ट्रेलिया या संकटाच्या काळात भारतासोबत असल्याचे म्हटले होते. तसेच व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कंसंट्रेटर्सची पहिली खेप विमानाने पाठवली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. यानंतर भारत सरकारकडूनही लगेचच ट्विट करत आभार मानले होते.
Just spoke with our friend, PM @narendramodi who thanked Australia for standing by India during the #COVID19 crisis. We’re supporting them with ventilators and oxygen concentrators. We won’t forget India’s generosity in exporting vaccines. We’ll work closely on global challenges.
— Scott Morrison (@ScottMorrisonMP) May 7, 2021
भारतात करोना विषाणूचा संसर्ग पाहता ऑस्ट्रेलियाने भारतातून ऑस्ट्रेलियात येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. यामुळे अनेक ऑस्ट्रेलियन नागरिकही भारतात अडकले आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने निर्बंधांनंतरही परत येणाऱ्या नागरिकांना 5 वर्षांच्या तुरुंगवासाची आणि दंडाची शिक्षा जाहीर केली. यानंतर जगभरातून ऑस्ट्रेलियावर टीका झाली. यानंतर ऑस्ट्रेलिया सरकारने मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात भारतातील ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांना परत आणण्यासाठी 3 विमानं पाठवणार असल्याचं जाहीर केलं. तसेच या प्रवाशांना परत आणल्यानंतर क्वारंटाईन करण्यात येईल अशीही माहिती देण्यात आली.