पुणे-हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे आणि कासारसाई या गावांसाठी संयुक्त नगरपरिषद स्थापन करण्याच्या दृष्टीने नगरविकास मंत्र्यांकडे बुधवारी प्राथमिक चर्चा झाली आहे. दरम्यान, या बैठकीत संयुक्त नगरपरिषद स्थापन करण्याबाबत विभागीय आयुक्त यांचा अहवाल मागविण्यात आला आहे. या अहवालामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद यांचे मतेसुद्धा जाणून घेतली जाणार आहे. विभागीय आयुक्त यांचा अहवाल आल्यानंतरच हिंजवडीसह सहा गावे मिळून नगरपरिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेतला जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
हिंजवडी येथे आयटी पार्क असून कामानिमित्त हजारो नागरिकांची ये-जा असते. तसेच, या परिसरात नागरिकीकरणही वेगाने वाढत आहे. या गावांमध्ये ग्रामपंचायत असल्याने पायाभूत
सोयी-सुविधा उभारण्यावर मर्यादा येतात. वाढता विकास पाहता या परिसराचा सुनियोजित विकास करण्यासाठी नगरपरिषद स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
मंत्रालय येथे नगरविकास मंत्री यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बुधवारी प्राथमिक चर्चा झाली. या बैठकीस पीएमआरडीए आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी ऑनलाइनद्वारे उपस्थित होते. या सहा गावांचा समावेश पीएमआरडीएच्या हद्दीत होतो. पीएमआरडीएने त्यांच्या हद्दीचा प्रारूप विकास आराखडा नुकताच प्रसिद्ध केला आहे. दरम्यान, ही गावे पिंपरी-चिंचवडमध्ये समाविष्ट करण्याची चर्चा मागील काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र, त्यावर अजून निर्णय झालेला नसताना नगरपरिषद स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
पुढील वर्षी अंतिम निर्णय
हिंजवडीसह सहा गावांसाठी नगरपरिषद स्थापन करण्यासाठी नियमानुसार प्रक्रिया पार पाडावी लागेल. विभागीय आयुक्त हे इतर स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हाधिकारी आणि पीएमआरडीए यांचे मते जाणून घेऊन नगरपरिषद स्थापन करावी किंवा नाही, याबाबतचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीनंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.