इंदापूर (प्रतिनिधी) – वन विभागाची परवानगी न घेता, भर रस्त्यावर मैल मजुरांकडून बेकायदेशीर वृक्षांची कत्तल केल्याने व प्रवाशांना रस्त्यावर कोणत्याही उपाययोजना उपलब्ध न केल्यामुळे इंदापूर तालुक्यातील कळस येथील ज्ञानदेव बाबुराव ससाणे (वय 55) या वन मजूराच्या अंगावर झाड पडून त्यांचा मृत्यू झाला.
सकाळपासून ते रात्री उशीर पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणतेही कर्मचारी, अधिकारी यांनी मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना साधी चौकशी देखील केली नाही. त्यामुळे बांधकाम विभागाच्या इंदापूर कार्यालयासमोर मृतदेह आणून बांधकाम विभागाच्या नावाने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
उपअभियंता व संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. बांधकाम विभागाचे कर्मचारी हे आज सकाळी 7 वाजता, इंदापूर विद्या प्रतिष्ठान कॉलेज रोडला खुळे चौकानजीक झाडे तोडत होते. यावेळी रस्त्याला कोणत्याही प्रकारची सुरक्षा बॅरिकेट्स लावण्यात आली नव्हती.
त्याचवेळी ज्ञानदेव ससाणे मोटारसायकलवरून अकलूज रोडकडून पुणे – सोलापूर महामार्गाकडे जात होते. अचानक त्यांच्या अंगावर झाड पडले आणि अपघात घडला. त्यांनतर त्यांना गंभीर दुखापत झाल्याने इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकामी दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी ज्ञानेश्वर ससाणे यांना गंभीर दुखापत झाल्याने मृत घोषित केले.
मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घ्यावी
इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी शासनाचे नियम पायदळी तुडवत नागरिकांना जीवाला मुकायला लावत आहेत. संबंधित उपअभियंता व अधिकारी कर्मचारी यांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ निलंबन करावे, अशी अपेक्षा मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी केलेली आहे.
ससाणे यांचे नातेवाईक यांनी उपअभियंता दीपक भोसले यांना संपर्क केला असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी मृतांचे नातेवाईक यांनी केलेली आहे. भोसले यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला असता, कोणताही प्रतिसाद त्यांनी दिला नाही.
एकही अधिकारी कार्यालयात नाही
या घटनेला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नसल्याने,नातेवाईक यांनी मृतदेह इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दारात नेऊन ठेवला. यावेळी तेथे केवळ लिपिक व शिपाई उपस्थित होते. एवढे अधिकारी नेमके गेले कोठे ? असा सर्व उपस्थित संतप्त नागरिकांना पडला होता.