नवी दिल्ली – उपराष्ट्रपती निवडणुकीत अलिप्त राहण्याचा निर्णय तृणमूल कॉंग्रेसने घेतल्याने विरोधी पक्षांमधील फाटाफूट पुन्हा चव्हाट्यावर आली. त्यामुळे तृणमूलच्या प्रमुख असणाऱ्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मनात नेमके आहे तरी काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राष्ट्रपती निवडणुकीप्रमाणेच उपराष्ट्रपती निवडणुकीतही संयुक्त उमेदवार देण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला. त्यानुसार, राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांची उमेदवारी 17 जुलैला जाहीर करण्यात आली. मात्र, अल्वा यांना पाठिंबा देण्यास नकार दर्शवताना तृणमूलने निवडणुकीपासूनच दूर राहण्याचे ठरवले. अल्वा यांचे नाव निश्चित करताना आमच्याशी कुठलीही चर्चा करण्यात आली नाही. त्यांच्या नावाची घोषणा करण्याची पद्धत आम्हाला रूचली नाही, अशी भूमिका तृणमूलने घेतली.
पण, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्वत: ममतांशी संपर्क साधला. तसेच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ममतांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती आता सुत्रांनी दिली आहे. सोनिया आणि पवार यांच्या प्रयत्नांना ममतांनी प्रतिसाद दिला नसल्याचेही सूचित होत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनियांनी 15 जुलैच्या रात्री ममतांशी फोनवरून संपर्क साधला. त्यावेळी विरोधकांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे कुठले संकेत ममतांनी दिले नाहीत.
त्यानंतर 16 जुलैच्या रात्री सोनियांनी पुन्हा ममतांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, तो होऊ शकला नाही. अल्वा यांचे नाव विरोधकांच्या बैठकीत निश्चित झाले. त्या बैठकीवेळी पवार यांनी ममतांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, ममता एका ऑनलाईन बैठकीत व्यस्त असल्याने त्यांच्यात बोलणे होऊ शकले नाही. सुत्रांनी दिलेली संबंधित माहिती पाहता विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ममतांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होत आहे.