IND vs ENG 2nd Test Day 4 Ravichandran Ashwin Record : भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विन इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत ऐतिहासिक कामगिरी करू शकतो. दुसऱ्या कसोटीचे तीन दिवस पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या दिवशी अश्विनने 1 बळी घेतला. आता त्याला 500 कसोटी बळी पूर्ण करण्यासाठी फक्त 3 विकेट्सची गरज आहे. विशाखापट्टणम येथे खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या चौथ्या दिवशी 3 बळी घेत अश्विन मोठी कामगिरी करू शकतो.
500 कसोटी बळी घेणारा अश्विन दुसरा भारतीय गोलंदाज ठरू शकतो. अश्विनपूर्वी माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने या मोठ्या आकड्याला स्पर्श केला होता. कुंबळेने आपल्या कारकिर्दीत 619 कसोटी बळी घेतले. कुंबळे हा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. या यादीत आर अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. कुंबळे हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा चौथा गोलंदाज आहे.
दरम्यान, इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी अश्विनने कसोटीत 490 विकेट घेतल्या होत्या. आता दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसापर्यंत त्याच्या नावावर 497 विकेट्स झाल्या आहेत. म्हणजेच आत्तापर्यंत या भारतीय फिरकीपटूंनं मालिकेत 7 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने आतापर्यंत 96 कसोटी सामने खेळले आहेत आणि तो इंग्लंडविरुद्ध (भारत विरुद्ध इंग्लंड दुसरी कसोटी) 97 वा सामना खेळत आहे.
अश्विनने आतापर्यंत 96 कसोटी खेळल्या आहेत. गोलंदाजीसोबतच अश्विनने फलंदाजीतही मोठे योगदान दिले आहे. आतापर्यंत त्याने 136 डावात 26.62 च्या सरासरीने 3222 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 5 शतके झळकावली आहेत.