India vs England 2nd Test (Day 3 Stumps) : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ 253 धावा करू शकला आणि भारताला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात गिलच्या शतकामुळे भारताने 255 धावा केल्या असून इंग्लंडसमोर विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसअखेर इंग्लंडने 399 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 1 बाद 67 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. पहिली विकेट गमावल्यानंतर इंग्लंडने रेहान अहमदला नाईट वॉचमन म्हणून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले आणि तो विकेट वाचवण्यात यशस्वी ठरला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जॅक क्रॉली 29 धावा आणि रेहान अहमद नऊ धावांवर खेळत होता. आता सामन्याचे दोन दिवस बाकी असून इंग्लंड यशस्वी पाठलाग करणार का तर दुसरीकडे भारताचे फिरकी गोलंदाज चौथ्या दिवशीच इंग्लंडचा दुसरा डाव लवकर गुंडाळत भारताला पाच सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी करुन देणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Stumps on Day 3 in Vizag 🏟️
England 67/1 in the second-innings, need 332 more to win.
An eventful Day 4 awaits 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/X85JZGt0EV#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/nbocQX36hB
— BCCI (@BCCI) February 4, 2024
इंग्लिश संघाला विजयासाठी अद्याप 332 धावांची गरज आहे. त्याचवेळी भारताला विजयासाठी नऊ विकेट्सची गरज आहे. इंग्लंडला एकमेव धक्का बेन डकेटच्या रूपाने बसला, त्याला अश्विनने यष्टिरक्षक भरतच्या हाती झेलबाद केले. बेन डकेटला 28 धावा करता आल्या.
IND vs ENG 2nd Test Day 3 : शुभमन गिलने झळकावले तिसरे शतक; संपादन केले ‘हे’ मोठे यश…
दुसऱ्या डावात भारताच्या 255 धावा…
दुसऱ्या डावात भारतीय संघ 255 धावांत गारद झाला. रेहान अहमदने अश्विनला बाद करून भारताचा डाव संपवला. या डावात भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 104 धावा केल्या. अक्षर पटेलने 45 आणि रविचंद्रन अश्विनने 29 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून टॉम हार्टलेने चार बळी घेतले. रेहम अहमदला तीन, जेम्स अँडरसनला दोन आणि शोएब बशीरला एक विकेट मिळाली.
पहिल्या डावात इंग्लंडच्या 253 धावा..
यशस्वी जैस्वालच्या द्विशतकामुळे पहिल्या डावात 396 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ 253 धावा करू शकला आणि भारताला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 76 धावा केल्या. यानंतर इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने 47 धावांची खेळी केली. मात्र उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. इंग्लिश फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. ऑली पोप, जॉनी बेअरस्टो आणि बेन फॉक्ससारखे फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. याशिवाय कुलदीप यादवने 3 बळी घेतले. अक्षर पटेलला 1 यश मिळाले.
टाॅस जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय…
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 396 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 209 धावा केल्या.
IND vs ENG 2nd Test Day 2 : यशस्वीचे शानदार द्विशतक; भारताचा पहिला डाव 396 धावांवर आटोपला…
मात्र याशिवाय भारताच्या एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा गाठता आला नाही. इंग्लंडकडून जिमी अँडरसन, शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. हैदराबाद कसोटीचा नायक टॉम हार्टलीला केवळ 1 यश मिळाले.