IND vs ENG 5th Test ( Dharamshala ) :- भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना गुरुवारपासून सुरू होत आहे. हा सामना धर्मशाला येथे होणार आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत ३-१ ने आघाडीवर असून पाचवी कसोटी जिंकून इंग्लंडला दणदणीत पराभव देण्याचा विचार करत आहे. मात्र, या संपूर्ण मालिकेत खेळपट्टीबाबत बरीच चर्चा झाली. हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली तेव्हा तेथील माजी क्रिकेटपटूंनी फिरकी खेळपट्टीबाबत भारताची खरडपट्टी काढली होती.
यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले आणि फारसे फिरकीपटू न घेता वेगवान खेळपट्ट्यांवरही इंग्लंडचा पराभव केला आणि मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली. आता धर्मशाळेची खेळपट्टी कशी असेल याबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. धर्मशालामध्ये जलदगती गोलंदाजांना मदत मिळते असे साधारणपणे दिसून येते. मात्र, या सामन्यासाठी टर्निंग विकेट तयार करण्यात आल्याचे मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे. त्यामुळे, इंग्लिश फलंदाजांना पुन्हा एकदा संथ टर्निंग विकेटचा सामना करावा लागू शकतो.
त्यामुळे, पाचव्या टेस्टमध्ये पुन्हा एकदा फिरकीपटूंचा दबदबा पाहायला मिळू शकतो. वास्तविक, सध्या धर्मशाळेतील हवामान खराब आहे. पुढील काही दिवस तेथे पाऊस पडू शकतो. एवढेच नाही तर अवकाळी पावसामुळे क्युरेटरला खेळपट्टीवर फारसे काम करण्याची संधी मिळालेली नाही.
धर्मशाला येथे एकच कसोटी खेळली गेली
धर्मशाला येथे आतापर्यंत फक्त एकच कसोटी सामना खेळला गेला आहे. २०१७ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली होती. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ३०० होती, तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या ३३२ आहे. तिसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या १३७ होती, तर चौथ्या डावातील सरासरी धावसंख्या १०६ होती.
“कसोटी सामन्यात संयमाने पुनरागमन करता येते. कोणत्याही खेळाडूला खेळपट्टीची चिंता नसते. खेळपट्टी कोणतीही असो, संघाला जिंकण्यासाठीच खेळावे लागते. या मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या तरुणांनी संघात चांगली कामगिरी केली आहे. १००व्या सामन्यात खेळणे कुठल्याही खेळाडूसाठी विशेष गोष्ट असते. मी अश्विनसह अंडर- १९पासून खेळलो आहे त्यामुळे त्याच्यासारखा फिरकीपटू पुन्हा होणे नाही.”
– रोहित शर्मा, भारतीय कर्णधार
अश्विन खेळणार १००वी कसोटी
रवीचंद्रन अश्विन म्हणजे फिरकीचा जादूगार. दुर्मिळ विक्रमांना गवसणी घालण्याचा छंद असलेला अश्विन आता त्याच्या कसोटी कारकिर्दीत अजून एक मोठा टप्पा गाठणार आहे. धरमशालातील भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी ही अश्विनच्या करियरमधील १००वा कसोटी सामना असणार आहे. अश्विन भारताकडून १०० वा कसोटी सामना खेळणारा १४वा तर तमिळनाडूचा पहिला वहिला खेळाडू ठरला आहे.
“इथे पोहोचण्यापूर्वी आक्रमणासाठी तीन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू संघात ठेवावा असा आमचा विचार होता. मात्र, जेव्हा आम्ही खेळपट्टी पाहिली तेव्हा पुन्हा दोन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह उतरण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीवर थोडे जास्त गवत असेल असे वाटले होते पण एकंदरीत विकेट फलंदाजीला अनुकूल दिसत आहे.
– बेन स्टोक्स, इंग्लंडचा कर्णधार
इंग्लंडच्या खेळाडूंनी घेतली दलाई लामांची भेट
बुधवारी सकाळी सराव करण्यापूर्वी इंग्लंडचे सहा खेळाडू आणि कर्मचाऱ्यांनी तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांची मॅक्लॉडगंज येथील निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतला. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत दलाई लामांनी खेळाडूंना प्रवचन दिले. इंग्लंडच्या सहा खेळाडूंमध्ये गस ऍटकिन्सन, जोनाथन बेअरस्टो, जॅक क्रॉली, टॉम हार्टले, डॅन लॉरेन्स आणि ऑली पोप यांचा समावेश होता.