सचिन इथापे
भुईंज – येत्या काही दिवसातच पहिलीपासूनच्या वर्गाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. विशेषतः पहिलीच्या वर्गात जाणाऱ्या लहान मुलांना व त्यांच्या पालकांसाठी आयुष्यातील नवीन पर्वाचा प्रारंभ असेल. परंतु यामध्ये शाळा मराठी माध्यमाची निवडावी की इंग्रजी माध्यमाची याचा गोंधळ मात्र नक्कीच उडताना दिसतो. त्याची कारणमिमांसा अनेकप्रकारे करता येईलही. पण, असा प्रश्न निर्माण होण्यामागे महाराष्ट्राच्या बोलीभाषेतील मराठी माध्यमातील शिक्षण आणि त्याचा दर्जा हे प्रमुख कारण दृष्टीआड करता येण्यासारखे नाही. परिणामत: आज मराठी माध्यमांच्या शाळा चालवण्याचे मोठे आव्हान समाजापुढेही निर्माण झाले आहे.
अलिकडे ग्रामीण भागातही अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय पालक देखील आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे मराठी शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस खालावताना दिसत आहे. भविष्यात हे थांबले नाही तर मराठी शाळांना घरघर लागून त्याचा फटका समाजातील गरीब वंचितांना बसेल, अशी स्थिती निर्माण होण्याची भिती आहे.
मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये अनेक पदवीधर व पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत. अनेक गुणवत्ताधारक शिक्षक आहेत. त्याचा फायदा मराठी माध्यमातील शाळांना होत नाही. आज काही प्रमाणात गावाकडील शाळेत सेमी इंग्रजी अध्यापन सुरू झालेले दिसते. ते पुढे जाऊन पूर्ण इंग्रजी माध्यमात होणे गरजेचं आहे. गणित व विज्ञान विषय इंग्रजी माध्यमातून शिकवले जातात. दहावीनंतर विज्ञान किंवा अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेत असताना इंग्रजी भाषेतून गणित, विज्ञान शिकवण्यात येते. कला व वाणिज्य शाखेतील काही विषय वगळता बहुतांश अध्यापन इंग्रजी भाषेतून होते. त्याचवेळी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा अडसर ठरणार नाही याची काळजी मराठी माध्यामांतील शाळांमध्येही घेणे गरजेचे आहे.
आर्थिक बजेट बिघडले
आजच्या परिस्थितीत सामान्य माणसाचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडलेले आहे. भविष्यातही सामान्य माणसाला त्यास तोंड द्यावे लागणारच आहे. आज मराठी शाळांमध्ये सरकारकडून सर्व गोष्टी मोफत पुरविल्या जातात. शाळेचा गणवेश, शूज, माध्यान्ह भोजन, शाळेची पुस्तके कोणतीही फी न घेता पुरवली जातात. परंतु तेथील शिक्षणाबाबत पालकांनाच खात्री वाटत नसल्याने त्यांना इंग्रजी माध्यमांचा निर्णय घ्यावा लागत आहे. या उलट इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रत्येक लहानसहान बाबींसाठीही पैसे गोळा केले जातात. त्यामुळे शिक्षकांनी तसेच शिक्षकांच्या विविध संघटनांनी मराठी माध्यमांच्या शाळांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याची गरज आहे.
======================