पालखीत सहभागासाठी शेकडो दिंड्या दाखल : इंद्रायणी घाट फुलला
एम. डी. पाखरे / ज्ञानेश्वर फड
आळंदी – जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांप्रमाणे राज्यासह परराज्यातील वारकरी श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आणि सोहळ्यासोबत पायी पंढरपूरला जाण्यासाठी आळंदी आणि देहूत दाखल झाले आहेत. शनिवारी (दि. 10) तीर्थक्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराज तर रविवारी (दि. 11) आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अलंकापुरीत मोठ्या संख्येने वारकरी दाखल झाले आहेत.
प्रस्थान सोहळ्यानिमित्त आळंदीला यात्रेचे स्वरूप आले आहे. टप्रस्थान सोहळ्यासाठी शेकडो दिंड्यांमधून लाखांवर भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. आळंदीतील सर्वच धर्मशाळा, मठ, आश्रम वारकऱ्यांनी गजबजून गेल्या आहेत. घाटावर विश्व शांती केंद्र येथे आता कीर्तन, प्रवचन, भजन आदी धार्मिक कार्यक्रम सुरु झाले आहेत.
आरोग्य उपसंचालकांकडून आळंदीत आढावा
राज्यभरातून आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी वारकरी भाविक आळंदी आणि देहूत दाखल झाले आहे, दाखल होत आहे. सर्व शासकीय यंत्रणा अँक्शन मोडवर आले आहे. गेले आठवडाभरापासून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे आणि आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षिका डॉ. उर्मिला शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य पथके कार्यरत झाली आहेत. (9 जून) आळंदी देवाची येथे आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांची आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याप्रसंगी भेट देऊन पहाणी करुन आढावा घेतला.
दर्शनबारी घाटाच्या पलीकडे
प्रस्थान सोहळ्याला आलेले बहुतांश वारकरी हे माऊलींचे समाधी दर्शन घेतात. लाखांवर भाविक आळंदीत दाखल झाल्याने नेहमी देऊळवाड्यात असणारी दर्शनबारी आता इंद्रायणी घाटाच्या पलीकडे गेली आहे. दर्शनासाठी 2तासाहून अधिक वेळ लागत असल्याचे भाविकांनी सांगितले.
प्रशासनाची जय्यत तयारी
पालखी प्रस्थान सोहळ्याला लाखो भाविक येणार या दृष्टीने माऊली देवस्थान, आळंदी नगरपरिषद, पोलीस प्रशासन, ग्रामीण रुग्णालय आदी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. नगरपरिषदेकडून सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येत आहेत. शहरात विविध ठिकाणी वैद्यकीय बुथ स्थापन करण्यात आले असून वारकऱ्यांची तपासणी, औषधोपचार सुरु आहेत. प्रशासनाच्या तासन्तास बैठका सुरु असून वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. माऊली मंदिरातही विश्वस्त, पोलीस प्रशासन यांच्या बैठका शुक्रवारी सुरु होत्या.
महिला वारकऱ्यांची संख्या लक्षणीय
वारी सोहळ्यासाठी लक्षणीय संख्येने महिला वारकरी आलेल्या आहेत. दरवर्षी ही संख्या मोठीच असते मात्र यावर्षी राज्य सरकारने महिलांना अर्धे तिकीट, तर ज्येष्ठांना मोफत प्रवास केलेला आहे. परिणामी महिला आणि ज्येष्ठांची संख्या अधिक आहे.