सातारा – जिल्ह्यात लंपी स्किनने मंगळवारी सर्वाधिक 21 जनावरांचा मृत्यू झाला आहे. पावसाची संततधार सुरु असल्याने लंपीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हळूहळू नियंत्रणात येत असलेला लंपी पावसामुळे पुन्हा वाढत असल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे.
महाबळेश्वर वगळता दहा तालुक्यांतील 154 गावांमध्ये लंपीची लागण झाली आहे. आजअखेर पाच हजार 360 जनावरांना लंपीचा प्रादुर्भाव झाला असून एकूण 342 पशुधन मृत झाले आहे. दोन हजार 127 जनावरे नियमित औषधोपचाराने बरी झाली आहेत. लंपी स्किन आजाराला रोखण्यासाठी आजपर्यंत 98.50 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
लंपीच्या उपचारासाठी आवश्यक सर्व औषधे, शासकीय पशुवैद्यकीय आणि तालुका लघु पशुचिकित्सालायांमध्ये उपलब्ध आहेत. जिल्हयातील तीन लाख 52 हजार 436 असून गोवर्गीय पशुधनापैकी आजअखेर तीन लाख 47 हजार 100 पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात आल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.