मुंबई -आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळत असलेल्या स्टार खेळाडूंचे मानधन वाढवा, अशी मागणी जागतिक क्रिकेटपटू संघटनेने बीसीसीआयला केली आहे. आयपीएल स्पर्धेतून बीसीसीआयला जितके उत्पन्न मिळते त्यातील केवळ 17 टक्के रक्कमच क्रिकेटपटूंना मानधन म्हणून वाटली जाते.
विराट कोहली, लोकेश राहुल किंवा रोहित शर्मा यांना जरी मानधनापोटी करोडो रुपये मिळत असतील तरीही ती रक्कम आयपीएलच्या एकूण उत्पन्नाच्या खूपच कमी आहे. अन्य देशांतील टी-20 लीगमध्ये आयोजक देशाला जितके उत्पन्न मिळते त्यातील तब्बल 71 टक्के वाटा क्रिकेटपटूंमध्ये वाटला जातो.
आयपीएलचे चित्र काय
आयपीएलच्या आयोजनातून बीसीसीआयला जितकी रक्कम मिळते त्यातून स्पर्धेतील सर्व 10 संघांना 490 कोटींचे उत्पन्न मिळते. म्हणजेच हे बीसीसीआयला मिळत असलेल्या एकूण उत्पन्नाच्या 50 टक्केच वाटा संघांमध्ये दिला जातो.
या व्यतिरिक्त या संघांना जवळपास 50 कोटी रुपये तिकीटविक्री, प्रायोजकता व अन्य स्पर्धा संबंधित साहित्याच्या विक्रीतून (टी-शर्ट वगैरे) मिळते. म्हणजे स्पर्धेतील एका संघाला 500 कोटी रुपये उत्पन्न मिळते व त्यातील केवळ 95 कोटी रुपये हे खेळाडूंच्या मानधनावर खर्च केले जातात.