वडूज – बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना गावोगावच्या जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाइन केले जात आहे. मात्र, वीज, स्वच्छतागृह आदी गरजेच्या सुविधांच्या अभावी या शाळा गैरसोयीच्या विळख्यात अडकल्याची तक्रार होत आहे.
खटाव तालुक्यात अद्याप करोनाच्या आजाराला शिरकाव झालेला नाही. संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाबरोबर गावोगावचे पदाधिकारी, जागृत नागरिक अहोरात्र मैहनत घेत आहेत.
दक्षता म्हणून परगावहून खेड्यापाड्यात येणाऱ्या नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत चौदा दिवसांसाठी क्वारंटाइन करण्याचा नियम तयार करण्यात आला आहे. अनेक गावांत या नियमांची काटेकोर पध्दतीने अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, अनेक दिवसाच्या सुट्टीमुळे या शाळा गैरसोयीच्या विळख्यात सापडल्या आहेत. काही ठिकाणी विजेची व्यवस्था नाही.
तर काही ठिकाणी फरशी उखडलेली आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा अभाव असण्याबरोबर स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी फॅनची सुविधा नसल्यामुळे रात्रीच्या वेळी उकाडा व डासांमुळे लोकांचे अतोनात हाल होत आहेत. या परस्थितीवर प्रशासनाने तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी होत आहे.
गरीबांसाठी शाळा… श्रीमंतांची सोय वेगळी
अनेक गावात पुण्या- मुंबईहून मोठ्या संख्येने चाकरमान्यांचे आगमन झाले आहे. अशा परिस्थितीत एखाद्या, दुसऱ्या गरीब कुटुंबातील नागरिकांना शाळेमध्ये क्वारंटाइन केले जात आहे. तर धनदांडगे व मसल पॉवर असणाऱ्यांना शेतातील घराचा पर्याय दिला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी व गावपातळीवरील आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका, पोलीस पाटील, सरपंच व ग्रामपंचायत, दक्षता समितीचे सदस्य व इतर कर्मचाऱ्यांनी नियम राबविताना गरीब, श्रीमंत असा भेदाभेद करु नये, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.