नवी दिर्ल्ली – नागरिकांचे आणि कंपन्यांचे उत्पन्न वाढत आहे. त्यामुळे एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत झालेले प्रत्यक्ष कर संकलन 24 टक्क्यांनी वाढले. या कालावधीत कर विभागाने तब्बल 8.77 लाख कोटी रुपये जमा केले असल्याची माहिती प्रत्यक्ष कर मंडळाने सोमवारी जाहीर केली.
अर्थ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातील प्रत्यक्ष कर संकलनाच्या उद्दिष्टापेक्षा यावर्षी कर संकलन जास्त होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. नोव्हेंबरपर्यंत अर्थसंकल्पातील उद्दिष्टाच्या 61.89% इतके कर संकलन झाले आहे. नोव्हेंबरपर्यंत झालेल्या कर संकलनापेक्षा हे कर संकलन 24 टक्क्यांनी जास्त आहे.
यावर्षी अर्थसंकल्पात 14.10 लाख कोटी रुपयाचे प्रत्यक्ष कर संकलन करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यामध्ये वाढ करून यावर्षी हे उद्दिष्ट 14.20 लाख कोटी करण्याचे ठरविण्यात आले आहे. मात्र हे उद्दिष्ट यावर्षी ओलांडले जाणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. प्रत्यक्ष कर संकलनात नागरिकांच्या प्राप्ती करांशिवाय कंपन्यांच्या कराचा समावेश होतो.
कर संकलनातून देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत अंदाज येतो. कर संकलन वाढत आहे त्यामुळे अर्थव्यवस्था वेगाने विस्तारत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे दिसून येते. यावर्षी करदात्यांना देण्यात येत असलेला परतावा 67 टक्क्यांनी वाढून 2.15 लाख कोटी रुपये इतका झाला आहे.
कर संकलन आणि परतावा देण्यासाठीची यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यात आली आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे करदात्यांना कर भरताना कसलाही त्रास होत नाही. आता पुढील वर्षी विवरण सादरीकरणाच्या फॉर्ममध्ये बऱ्याच सुधारणा केल्या जाणार असल्यामुळे नागरिकांना सुविधा मिळणार आहे.
प्रत्यक्ष कर संकलनाबरोबरच अप्रत्यक्ष कर संकलन म्हणजे वस्तू आणि सेवा कर संकलन वेगाने वाढत असल्याचे आकडेवारी दर महिन्याला जाहीर होत असते. सध्या प्रत्येक महिन्याला वस्तू आणि सेवा करातून म्हणजे जीएसटीमधून सरकारला तब्बल 1.45 ते 1.50 लाख कोटी रुपये मिळत आहेत. यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या उत्पन्नात वाढ होत आहे. मात्र असे असले तरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक करीत असल्यामुळे यावर्षी तूट काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.