संगमनेर -साईभक्तांच्या सुविधेसाठी वर्षभरापासून तयार असलेली दर्शनरांग तातडीने खुली करा, उद्घाटनाला पंतप्रधानांचा वेळ मिळाला नाही तर भक्तांची वर्षानुवर्ष गैरसोय होऊ देणार का? असा प्रश्न उपस्थित करतानाच आ. बाळासाहेब थोरात यांनी संस्थान प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच कारभार करावा. त्यांच्यामुळेच आपण साई भक्तांना सोयी-सुविधा पुरवू शकतो, याची आठवण मुख्यमंत्र्यांना करून दिली.
आ. बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दर्शन रांग आणि शैक्षणिक संकुल तातडीने सुरू करण्याची मागणी केली. आ. थोरात यांनी पत्रात म्हटले आहे की, श्री साईबाबा संस्थान प्रशासनाकडून ग्रामस्थांना विश्वासात न घेता काही निर्णय घेतले जातात. त्यातून ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या जातात. सध्यादेखील शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा अनिता जगताप यांच्यासह सर्वपक्षीय ग्रामस्थांनी संस्थानच्या निर्णयाविरोधात उपोषण केले. साईभक्तांना ऊन, वारा, पाऊस याचा त्रास होऊ नये आणि दर्शनाची सुविधा सुलभ व्हावी यासाठी दर्शनरांग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षभरापासून दर्शनरांग बांधून पूर्ण झाली आहे. सुसज्ज दर्शनरांग असतानाही भाविकांना उघड्यावर दर्शनासाठी उभे राहावे लागते.
साईबाबा संस्थानतर्फे विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून सुसज्ज शैक्षणिक संकुल बांधून पूर्ण झालेले आहे. महत्त्वाचे म्हणजे या सर्व सुविधा साईबाबा संस्थाननेच उभ्या केलेल्या आहेत. असे असतानाही या सुविधा खुल्या केल्या जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पांचे लोकार्पण करण्याचा सरकारचा मनोदय असल्याचे आम्हास कळाले होते. आमचीही त्याबाबत काहीही हरकत असण्याचे कारण नाही. मात्र, केवळ उद्घाटनाला वेळ मिळत नाही म्हणून दर्शनरांग किंवा शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण रोखणे हा भक्तांवर अन्याय ठरेल. पुढेही वर्षानुवर्षे उद्घाटनासाठी वेळ मिळाला नाही, तर आपण भक्तांची गैरसोय होऊ देणार का? त्यामुळे स्थानिक राजकीय हस्तक्षेपाला आणि दबावाला बळी न पडता, या सुविधा तातडीने सुरू केल्या गेल्या पाहिजेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्तिशः या प्रकरणात लक्ष घालावे आणि भाविकांसाठीच्या सोयी-सुविधा तातडीने सुरू करून द्याव्यात, असे आ. थोरात यांनी पत्रात म्हटले आहे.