लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या तरी सर्वच पक्ष राज्यातील छोट्या पक्षांना आपल्या सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. समाजवादी पक्षाने अनेक छोट्या पक्षांना सोबत घेतलं. तर भाजपने देखील अनेक पक्षांसोबत युती केली. आता एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी देखील येथील दोन पक्षांसोबत युती करत आपला निवडणूकचा प्लॅन सांगितला.
ओवेसी यांनी शनिवारी बाबू सिंह कुशवाह आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्यासोबत युती करण्याची घोषणा केली. आमची युती सत्तेवर आल्यास राज्याला २ मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री असतील. दोन मुख्यमंत्र्यांपैकी एक ओबीसी तर दुसरा दलित समाजाचा असेल, असं ओवेसी यांनी म्हटलं. तसेच राज्याला तीन उपमुख्यमंत्री असतील. त्यापैकी एक मुस्लिम समाजातील व्यक्ती असेल, अशी घोषणा त्यांनी केली.
यापूर्वी ओवेसी यांनी ओमप्रकाश राजभर यांच्यासोबत युती केली होती. मात्र राजभर यांनी युती तोडून सपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र आता ओवेसी यांनी बाबू सिंह कुशवाह आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्यासोबत युतीची घोषणा केली.
दरम्यान निवडणुकीबाबत बोलताना ओवेसी म्हणाले की, उत्तर प्रदेशातील मुस्लिमांवर अन्याय झाला आहे. राज्यातील कोणत्याही सरकारने राज्यातील मुस्लिमांच्या विकासासाठी काम केलेले नाही, असं ओवेसी म्हणाले.